प्रतिनिधी / खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शिवस्मारकात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर पाटील होते. यावेळी तालुक्यात समितीची जागृती करण्यासाठी 21 ऑक्टोंबर रोजी तालुक्यात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रंथ दिंडी काढून गावोगावी समितीच्या व मराठीच्या जागृतीसाठी उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. याची सुरुवात खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील ज्ञानेश्वरी मंदिरापासून 21 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात येणार आहे. यानंतर तालुक्यात प्रत्येक मराठी गावात पालखी प्रदक्षिणा करण्यात येणार आहे. या माध्यमातून मराठीचा जागर समितीची पुनर्बांधणी असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
यावेळी प्रकाश चव्हाण मुरलीधर पाटील, यशवंत बिरजे, नारायण कापोलकर, शिवाजी पाटील, अविनाश पाटील, आबासाहेब दळवी, वसंत नवलकर, मर्याप्पा पाटील, रुक्कमांना जुजवाडकर यासह इतर कार्यकर्त्यांनी विचार मांडले.