’सेव्ह म्हादई’ मंचतर्फे विर्डीत आयोजन
प्रतिनिधी /पणजी
म्हादईसाठी आज सोमवारी विर्डी येथे होणारी सभा ही केवळ म्हादईच्याच नव्हे तर समस्त गोमंतकीयांच्याही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा लढा यशस्वी करावा, असे आवाहन ’सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ मंचतर्फे करण्यात आले आहे.
मंचच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत विर्डी-आमोणा पुलाजवळ आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या या महासभेसंबंधी माहिती दिली. त्यावेळी प्रजल साखरदांडे, अॅड. हृदयनाथ शिरोडकर, विकास भगत, तनोज अडवलपालकर, महेश म्हांबरे, यांची उपस्थिती होती.
यापूर्वी 1967 मध्ये आजच्याच दिवशी गोव्याच्या अस्तित्वासाठी ऐतिहासिक जनमत कौल घेण्यात आला होता. त्यामुळे गोवा महाराष्ट्रात विलीन होण्यापासून वाचला होता. त्याच धर्तीवर आता म्हादईच्या अस्तित्वासाठी लढा उभारण्यात येत असून त्याद्वारे म्हादईचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी या महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
साखरदांडे यांनी बोलताना, म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून राज्यातील सहा तालुक्यांना तिचे पाणी मिळते. अशावेळी केंद्राने कर्नाटकाच्या डीपीआरला दिलेली मान्यता रद्द केली नाही, त्याच्याच आधारे म्हादई वळविण्यात आली तर गोमंतकीयांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली. आमची म्हादई आम्हाला मिळावी हा या सभेमागील हेतू असल्याचे ते म्हणाले.
म्हादईसह गोव्याच्या अस्तित्वासाठी उभारलेला हा लढा आहे. आमच्यासाठी म्हादई महत्वाची आहे. तसेच ती वाचविणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून तर हा लढा यशस्वी होणार आहे. त्यामुळे सर्व गोमंतकीयांनी महासभेस उपस्थिती लावावी, असे आवाहन अॅड. शिरोडकर यांनी केले. या सभेसाठी एकत्र आलेला प्रत्येक नेता हा प्रथम गोमंतकीय आणि नंतर राजकारणी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे ही सभा राजकीय नाही. त्यामुळे सर्व 40सही आमदारांनी सभेसाठी एका व्यासपीठावर यावे व डीपीआरला दिलेली मान्यता केंद्राकडून रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवावा, असेही ते म्हणाले. आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज गोव्यातील अनेक स्वयंसेवी संघटना, मंच, तसेच व्यक्तीगत लोकांनीही सेव्ह म्हादई मंचला पाठिंबा दर्शविला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आजच्या दिवशी दरवर्षी मडगावात होणारा ’जनमत कौल’ वर्धापन कार्यक्रम सुद्धा यंदा सांखळीत आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. यावरून हे आंदोलन गोमंतकीयांसाठी किती महत्वाचे आहे ते लक्षात येते, असे शिरोडकर म्हणाले. म्हादई मातेच्या हाकेला ओ देऊन तिच्या प्रत्येक सुपुत्राने या सभेस उपस्थित रहावे. त्यायोगे कर्नाटक, केंद्र आणि अन्य सर्वजण जे म्हादई वळविण्यास पहात आहेत त्यांना, या मुद्यावर समस्त गोमंतकीय एकत्र आहेत, हेच दाखवून द्यावे, असे आवाहन शिरोडकर यांनी केले.
विकास भगत, तनोज अडवलपालकर, महेश म्हांबरे, यांनीही यावेळी विचार मांडले. तसेच या महासभेस खास करून युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.