आरसीबीच्या पदरी पुन्हा प्रतीक्षा हैदराबादला पराभूत करत मुंबईचा थाटात प्लेऑफमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/ मुंबई, बेंगळूर
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आपला अखेरचा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळला. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी प्राप्त झाली. होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईने विजयी अखेर केल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष करताना आपल्या चाहत्यांचे धन्यवाद मानले.
मुंबईसाठी या हंगामाची सुरुवात चांगली झाली नव्हती. मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर त्यांनी विजयी लय प्राप्त करताना सलग तीन विजय मिळवले. त्यानंतरही विजय पराभव असा खेळ सुरू राहिला. अखेरीस त्यांना आपल्या प्ले ऑफ प्रवेशासाठी आरसीबीच्या पराभवावर अवलंबून राहावे लागले. आरसीबीचा घरच्या सामन्यात पराभव झाल्याने मुंबईने 16 गुणांसह प्ले ऑफ्ससाठी पात्रता मिळवली. लखनौविरुद्ध हाती आलेला सामना गमावल्याने एकवेळ मुंबई प्लेऑफसाठी पात्र ठरेल की नाही यात शंका होती. मात्र आरसीबीचा पराभव झाल्यानंतर मुंबईला प्लेऑफचे तिकीट मिळाले.
वानखेडेवर मुंबईचाच दबदबा
मुंबईने हंगामात घरच्या मैदानावर सात सामने खेळले. यापैकी एकाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईविरुद्ध त्यांनी हा सामना गमावला. विशेष म्हणजे, या हंगामात घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याची कामगिरी देखील मुंबईनेच केली. या मैदानावर तीन वेळा 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केला. अर्थात, वानखेडे स्टेडियमवर आपल्याला मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल त्यांनी मुंबईच्या चाहत्यांचे विशेष आभार मानले. हैदराबादविरुद्ध सामना जिंकल्यानंतर त्यांनी प्रेक्षकांचे अभिवादन करण्यासाठी संपूर्ण मैदानाला फेरी मारली. यामध्ये संघाचा आयकॉन तसेच भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा देखील सहभागी झाला. कर्णधार रोहित शर्मा व संपूर्ण संघ चाहत्यांचे धन्यवाद मानताना दिसून आला.
आरसीबीच्या पदरी पुन्हा प्रतिक्षा
बेंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी व गुजरात टायटन्स यांच्यात अखेरचा साखळी सामना झाला. हा सामना गुजरातने जिंकत आरसीबीला चांगलाच दणका दिला. या पराभवासह आरसीबीचे आयपीएल पटकावण्याचे स्वप्न आणखी एक वर्ष पुढे गेले. विशेष म्हणजे, आयपीएल इतिहासात आरसीबीला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदाच्या हंगामात त्यांची कामगिरी जबरदस्त राहिली पण मोक्याच्या क्षणी हार पत्कारावी लागल्याने त्यांना आता जेतेपदासाठी पुढील हंगामाची प्रतिक्षा करावी लागेल.
या संपूर्ण हंगामात आरसीबीच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. कर्णधार डू प्लेसिस 14 सामन्यांमध्ये 730 धावांसह सर्वाधिक धावा करणाल्रह फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी राहिला. विराटनेदेखील कमालीचे सातत्य दाखवतात 14 सामन्यांमध्ये 639 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने देखील वेळोवेळी संघाला सावरले. अनुभवी दिनेश कार्तिकला यंदाच्या हंगामात पूर्ण फ्लॉप ठरला. गोलंदाजीत मोहम्मद सिराजने चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. इतर गोलंदाजांना मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. युवा अनुज रावत, महिपाल लोमरोर व सुयश प्रभूदेसाई यांनी सपशेल निराशा केली.
दोन भाऊ, दोन चॅम्पियन कर्णधार असलेल्या संघांत रंगणार प्लेऑफचे सामने
रविवारी आयपीएलच्या साखळी फेरीची सांगता झाल्यानंतर आजपासून प्लेऑफमधील लढतींना सुरुवात होणार आहे. यामध्ये गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या व लखनौचा कर्णधार कृणाल पंड्या हे दोघे भाऊ तर आयपीएलमधील चॅम्पियन कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांच्या चेन्नई व मुंबई संघानी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. अर्थात, दोन भाऊ, दोन चॅम्पियन कर्णधार असलेल्या दिग्गज संघामध्ये होणारे प्लेऑफमधील सामने निश्चितच रोमांचक होतील यात शंकाच नाही.
आयपीएलच्या इतिहासात मुंबईने सर्वाधिक जेतेपद मिळवली असून त्याखालोखाल चेन्नईचा नंबर लागतो. गुजरात विद्यमान जेता असून यंदाही त्यांनी अव्वलस्थान मिळवत आपणच दावेदार असल्याचे सिद्ध केले आहे. लखनौनेही शानदार कामगिरी करताना आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. यामुळे यंदाच्या हंगामात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.