अॅड. आनंद गावकर यांचा इशारा : धरणग्रस्तांना सोडून इतर शेतकऱ्यांचा सन्मान धरण परिसरात करणे योग्य नव्हे
सांगे : सरकारकडून साळावली धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार केला जात आहे. अशा परिस्थितीत 15 ऑगस्ट रोजी साळावली धरणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त जलस्रोत खात्याने धरणग्रस्तांना सोडून इतर शेतकऱ्यांचा सन्मानाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा निषेध म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना काळे बावटे दाखविण्यात येतील, असे धरणग्रस्तांच्या वतीने अॅड. आनंद गावकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
मुख्य म्हणजे धरणग्रस्तांना सोडून इतर शेतकऱ्यांचा सन्मान केला जात आहे, तो सुद्धा साळावली परिसरात, हे योग्य नाही. जलस्रोतमंत्र्यांनी सर्वप्रथम धरणग्रस्तांच्या समस्या आणि प्रश्न निकालात काढणे गरजेचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या विरोधात मुळीच नसून सरकारच्या कृतीच्या विरोधात आहोत. आम्ही न्याय देण्याची मागणी करत असताना आमच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार सरकार करू पाहत आहे. ज्या दिवशी तिरंगा हातात घेऊन उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करायचा त्याच दिवशी खितपत पडलेल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळे झेंडे घ्यावे लागणार. हा आमचा नाईलाज आहे, असे गावकर यांनी नमूद केले.
यावेळी त्यांच्यासोबत संतोष गावकर, महेश गावकर, व•ाs कालेकर, सुनील गावकर, बाबी गावकर व इतर उपस्थित होते. पुढे बोलताना आनंद गावकर म्हणाले की, गेल्या 47 वर्षांत धरणग्रस्तांना न्याय दिला गेला नाही. या कालावधीत कित्येक सरकारे आली आणि गेली. आमदारही आले आणि गेले. पण धरणग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. कोणीही या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत नाही. आता सहनशीलतेचा अंत झाला असून दुसरा पर्याय राहिलेला नाही, असे त्यांनी सांगितले. जलस्रोत खाते साळावली धरणाचे पाणी वापरून ज्यांनी चांगली शेती केली त्यांचा सन्मान करू पाहत आहे आणि तो सुद्धा साळावली धरण परिसरात. हा कार्यक्रम साळावली धरण परिसरात न करता अन्य कुठेही करण्यास आमचा मुळीच विरोध नाही. सरकारने तो रद्द न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून काळे झेंडे दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा गावकर यांनी दिला.
आदिवासी नेत्यांनीही सहानुभूती दाखविलेली नाही
आदिवासी समाजातील नेत्यांनी आदिवासींचे हक्क कोणते आहेत याची माहिती देणारे उपक्रम राबविण्यापेक्षा ते हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्यास अधिक चांगले वाटले असते. पण आजपर्यंत कोणत्याही आदिवासी नेत्याने धरणग्रस्त बांधवांना आपली सहानुभूती दाखविलेली नाही, असा आरोप अॅड. गावकर यांनी केला.