कबनूर,वार्ताहर
Prakash Awade News : कबनूर (ता. हातकणंगले) येथील जलजीवन पाणीपुरवठा योजना अंतर्गत वाढीव २२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक पुरवणी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे ही ५०.७३ कोटी रुपयांची सुधारित जलजीवन पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्णत्वास येईल. यामध्ये घरगुती नळ कनेक्शन जोडणे सोलर प्रकल्प उभारणे पाईपलाईनसाठी खुदाई केलेले रस्ते पूर्वक करणे आधी कामांचा यामध्ये समावेश असणार आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
शासनाच्या जलजीवन मिशन योजना अंतर्गत कबनूर गावासाठी नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम सुरु असून योजना अंतर्गत आवश्यक जलकुंभ उभारणी स्थळाची मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी पाहणी करुन जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी भेट दिली. त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
कबनूर गावचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी २९ कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर झाली होती.परंतु या जलजीवन योजनेत घरगुती नळ कनेक्शन जोडून देणे, सोलर प्रकल्प उभारणे,पाइपलाईनसाठी खुदाई केलेले रस्ते पूर्ववत करणे आदी कामांचा समावेश नसल्याने त्याबाबत ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात होती.या त्रुटीवर चर्चा करण्यासाठी बोलविलेल्या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांना सुरु असलेले जलजीवन योजनेचे काम परिपूर्ण होण्यासाठी सुधारीत अंदाजपत्रक तयार करून ते शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या.आमदार आवाडे यांच्या सूचनेनुसार उपअभियंता जे.डी. काटकर यांनी या योजनेत नव्याने समाविष्ट कामांच्या समावेश असलेल्या सुधारीत २२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रका बाबत सविस्तर चर्चा केली.त्यामुळे मंजूर २९ कोटी व वाढीव २२ कोटी अशी ५०.७३ कोटी रुपयांची सुधारीत पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्णत्वास येईल असा विश्वास आमदार आवाडे यांनी बोलून दाखविला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे,समीर जमादार,वैशाली कदम,सुनिता आडके,बबन केटकाळे,नितीन काडाप्पा,जयसिंग पाटील व युवराज पाटील उपस्थित होते.