पुणे / प्रतिनिधी
मशिदीवरून भोंग्याद्वारे अजान केली जाणार नाही, अशी लेखी ग्वाही पुण्यातील सर्व मशिदींच्या मौलवींनी पोलिसांमार्फत द्यावी. तसे केल्यास कोणतीही तेढ निर्माण होण्याचे कारण नाही. अन्यथा आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून आम्हाला आपल्या पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा म्हणावी लागेल, असा इशारा मनसेने थेट पुणे पोलिसांना दिला आहे.
याबाबतचे पत्र पक्षाने पोलीस आयुक्तांना धाडले आहे. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यावरून मशिदींवरील भोंग्यांबाबत जे आंदोलन सुरू झाले आहे, ते पुढे चालूच राहील. या भूमिकेस संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे शहर व जिल्हा बांधील आहे. भोंगा हा सामाजिक विषय आहे व आम्हालाही धार्मिक तेढ निर्माण करावयाची हौस नाही. परंतु आम्ही आमच्या भूमिकेपासून फारकत घेऊ शकत नाही व त्यामुळेच या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याकडे मागणी करते, की संपूर्ण पुणे शहरात साधारणपणे 400 ते 450 मशिदी अस्तित्वात आहेत. जवळपास सर्वच मशिदींवरील भोंगे अनधिकृत आहेत. ते भोंगे उतरवावेत अथवा ते कायमस्वरूपी बंद अवस्थेत ठेवावेत. जेणेकरुन यावरुन मोठय़ा आवाजात बाहेर पडणाऱया अजानचा त्रास आजूबाजूला राहणाऱया नागरिकांना होणार नाही. अजानला आमचा विरोध नाही, परंतु ती भोंग्याद्वारे करावयाची नाही, यावर आम्ही ठाम आहोत.
पुण्यातील सर्व मशिदींचे जे मौलवी आहेत. त्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांच्याच मध्यस्थीने आम्हाला पोलिसांमार्फत लेखी स्वरुपात ग्वाही देऊन कळवावे, की आमच्या मशिदीवरून भोंग्याद्वारे अजान केली जाणार नाही. या पद्धतीने ग्वाही मिळाल्यास धार्मिक अथवा सामाजिक तेढ निर्माण होण्याचा प्रŽ उरणार नाही व आमच्यासह तेही कायद्याला बांधील राहतील. म्हणूनच या मागणीचा तत्काळ विचार करून मौलवींकडून पोलिसांच्या मध्यस्थीने अशा स्वरुपाची ग्वाही देण्यात यावी. अन्यथा, आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून आम्हाला आपल्या पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा म्हणावी लागेल, असे या पत्रात म्हटले आहे.