जगदीश शेट्टर : अंगडी इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद
बेळगाव : भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी सकाळी सावगाव रोड येथील अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारताला महासत्ता बनविण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक असल्याचे मत लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले. देशाची अर्थव्यवस्था मागील दहा वर्षांत बळकट होत आहे. जगात 14 व्या क्रमांकावर असणारी अर्थव्यवस्था दहा वर्षांत पाचव्या स्थानी पोहोचली आहे. देश महासत्ता होण्याच्या दिशेने कार्यरत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा संधी देणे गरजेचे आहे, असे आवाहन जगदीश शेट्टर यांनी कॉलेजचे कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना केले. खासदार मंगला अंगडी म्हणाल्या, भाजपची ध्येयधोरणे ही देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी आहेत. माजी खासदार सुरेश अंगडी यांच्या दूरदृष्टीतून बेळगावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्मार्टसिटी, अत्याधुनिक रेल्वेस्थानक, इंटरनॅशनल एअरपोर्टच्या दर्जाचे विमान टर्मिनल उभारण्यात कै. सुरेश अंगडी यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्ह्याची अशीच प्रगती व्हावी असे वाटत असल्यास जगदीश शेट्टर यांना मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, शिल्पा शेट्टर, श्रद्धा शेट्टर, राजू दोशी, डॉ. किरण पोतदार, संगीता देसाई, बी. एम. पाटील, डॉ. धनश्री कुलकर्णी यांच्यासह इतर उपस्थित होते.
काँग्रेसकडून नागरिकांची फसवणूक
सध्याच्या काँग्रेस सरकारकडून राज्यातील जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमातीचा राखीव निधी कमी करण्यात आला असून हा निधी गॅरंटी योजनांसाठी वापरण्यात येत आहे. यामुळे राज्यातील अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांना योजनांसाठी निधी कमी पडत आहे. आपण अनुसूचित जाती-जमाती तसेच दलितांसोबत असण्याचा आव आणणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका भाजपच्या जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी विजयकुमार कडेनूर, महादेवी हिरेमठ, हणमंत केंगाली यासह इतर उपस्थित होते.