मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर : सौंदत्ती मतदारसंघात केला जोरदार प्रचार
बेळगाव : पराभवाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून समाजात दुही माजविण्याचे काम केले जात आहे. अत्यंत खालच्या पातळीवर येऊन टीका केली जात आहे, हे अशोभनीय आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे बोले तैसा चाले आहे, असे उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सुधाकर यांनी सांगून भाजपवर हल्लाबोल केला. सौंदत्ती विधानसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या इनामहोंगल येथील सिद्धलिंगेश्वर माध्यमिक शाळेच्या मैदानावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने दिलेले वचन पाळले आहे. 2014 पासून केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजप नेत्यांकडून अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. 2014 मध्ये सोन्याचा भाव 27,000 रुपये होता. आता 2024 मध्ये 70 हजारांपेक्षा अधिक आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने गोरगरिबांच्या कल्याणासाठी पाच गॅरंटी योजना राबवून मोठा दिलासा दिला आहे.
मात्र, केंद्र सरकारकडून राज्यावर अन्याय करण्यात आला आहे. दुष्काळ निधी वितरणात भेदभाव केला जात आहे. शेतकऱ्यांच्या नावाने निवडणूक लढविणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांचे काय हित साधले हे दाखवून द्यावे, असा सवाल त्यांनी केला. उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर गॅस देण्यात आले आहेत. मात्र, सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाव उतरविण्यात आले आहेत. सर्वसामान्यांचे कल्याण साधणाऱ्या काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा व उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन डॉ. सुधाकर यांनी केले. काँग्रेस पक्षाकडून विकासाभिमुख योजना राबविल्या जात आहेत. 20 वर्षांनंतर या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला विजयाची संधी मिळाली आहे. मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. यावेळी आमदार विश्वनाथ वैद्य, बसय्या हिरेमठ, संगाप्पा लक्कण्णावर, रामण्णा तुरमुरी, बसाप्पा अळगवाडी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.