बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दिल्ली दौरा राजकीयदृष्टय़ा अनेकार्थांनी महत्त्वाचा मानावा लागेल. या दौऱयात नितीश यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, ‘आप’चे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने देशस्तरावरही ‘महागठबंधन’च्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. अर्थात प्रत्यक्ष हा प्रयोग आकारास येणार का, हे पाहण्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. मित्रपक्ष भाजपाला धक्का देत नितीश यांनी बिहारमध्ये राजद व काँगेससह सरकार स्थापन केल्याला काहीच दिवस उलटले आहेत. त्यानंतर देशातही भाजपाविरहित सरकार आणण्यासाठी त्यांनी विरोधकांना एकीची हाक दिल्याचे पहायला मिळते. वास्तविक 2019 च्या निवडणुकीआधीच नितीश यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घेण्यात येत होते. मात्र, बिहारमध्ये राजदसोबत महागठबंधन घडविणाऱया नितीश यांनी तत्पूर्वीच भाजपाशी संधान साधल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा एकदा नितीश यांच्या नावाची चर्चा होत असली, तरी त्यांच्या पक्षाचे पूर्वीइतके बळ राहिलेले नाही, हे मान्य करावे लागेल. 2010 मध्ये तब्बल 115 जागा मिळविणाऱया नितीश यांच्या पक्षाच्या जागा 2020 च्या निवडणुकीत तब्बल 43 पर्यंत घसरल्या होत्या. भाजपानेच आतून लोकजशक्ती पार्टीला पुढे करीत संयुक्त जनता दलाचा शक्तिक्षय केला, ही बाबही तशी लपून राहिलेली नाही. त्यानंतरही मुख्यमंत्रिपद नितीश यांच्याकडे ठेवण्याची खेळी भाजपा खेळला असला, तरी ही सल नितीश यांच्या मनात होती. त्यात महाराष्ट्रात भाजपाने एकनाथ शिंदेंमार्फत सेनेचा गेम केल्यानंतर सावध झालेल्या नितीश यांनी अखेर आपल्याच मित्रपक्षाचा करेक्ट कार्यक्रम करीत बिहारमध्ये पुन्हा गठबंधन घडवून आणले. आता त्यांचे पुढचे लक्ष्य ‘मिशन इंडिया’ असणार, हे वेगळे सांगायला नको. लोकसभा निवडणुका दीड वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यादृष्टीने नितीश यांनी आत्तापासूनच भेटीगाठींना सुरुवात केल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱयात मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही. मला तशी इच्छा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची इच्छा असो वा नसो. आज तरी नितीश यांना, हीच बाराखडी गिरवावी लागणार. तृणमूलच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेतेही पंतप्रधानपदाची मनीषा बाळगून आहेत. अशा वेळी आपणही त्याच रांगेत असल्याचे ते वरकरणी तरी दाखविणार नाहीत. तितके शहाणपण त्यांच्याकडे नक्कीच असावे. काँग्रेस, डावे व प्रादेशिक पक्षांसह विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याची वेळ आली असल्याकडेही नितीशबाबू लक्ष वेधतात. खरे तर 2020 ची निवडणूक ही भाजप व इतर पक्ष अशीच असेल. काँग्रेस दुर्बल झाला असला, तरी अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सक्षम आहेत. हे पाहता विरोधकांची एकजूट झाली, तर भाजपापुढे आव्हान उभे राहू शकते, यात दुमत नाही. म्हणूनच नितीश काँग्रेसपासून ते राष्ट्रवादीपर्यंत सगळय़ाच पक्षांच्या धुरिणांशी हितगुज करताना पहायला मिळतात. राहुल गांधी यांच्याशी झालेली त्यांची भेट महत्त्वाचीच. काँग्रेसबद्दल कितीही टीकाटिप्पण्या होवोत. परंतु, काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी होऊ शकत नाही. याचे भान नितीश यांना नक्कीच असणार. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, ईशान्य भारतात अजूनही भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसच आहे. शिवाय पंजाब, केरळसारख्या राज्यातही पक्षाची ताकद आहे. काँग्रेसने जोर लावला, तर तेथील जागा वाढणारच नाहीत, असे नाही. दुसऱया बाजूला कर्नाटक वगळता अन्य दक्षिणी राज्यात अद्यापही भाजपची म्हणावी तशी ताकद वाढलेली नाही. त्याचबरोबर एखाद दुसरे राज्य वगळता भाजपासाठी कोणताच टापू ‘सेफ झोन’ नाही. त्यामुळे सर्वत्रच भाजपापुढे आव्हान निर्माण करता येऊ शकते, असे नितीश यांना वाटते. दिल्ली, गुजरात, हरियाणामध्ये आपने भाजपापुढे आव्हान निर्माण केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजप व शिंदेसेनेला जड जाऊ शकते. अशा वेगवेगळय़ा शक्याशक्यतांचा त्यांनी अभ्यास केलेला दिसतो. तथापि, विरोधकांमधील अंतर्विरोधाचे काय, याचाही त्यांनी विचार करायला हवा. तृणमूल, आप यांनी काँग्रेससारख्या पक्षाला कायम कडाडून विरोध केला आहे. ममतादीदी आणि काँग्रेस यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. आप व काँग्रेसमधील संबंधही मधुर नाहीत. हे पाहता हे पक्ष एकमेकांच्या जवळ कसे येणार? ही किमया नितीश काय, दुसऱया कुणाला तरी साधेल काय, हा प्रश्नच आहे. देशभर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला आहे. महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नांमुळे भाजपाला टीकेचे धनी व्हावे लागले असले, तरी मोदी यांची लोकप्रियता टिकून आहे. त्यात भाजपाकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखा हुकमी एक्का आहे. शहांच्या चाणक्यनीतीमुळे रणनीतीत भाजप सर्वांत सरस ठरतो. स्वाभाविकच भाजपाचा अश्वमेध रोखण्याचे खडतर आव्हान विरोधकांपुढे असेल. तत्पूर्वी ‘महागठबंधन’ साकारण्याच्या आव्हानाचा त्यांना सामना करावा लागेल. आज भाजपाच्या महाशक्तीकडे कुणा एकटय़ा दुकटय़ा पक्षाचा टिकाव लागू शकत नाही. हे सत्य स्वीकारण्याची तयारी असेल, तरच असा प्रयोग प्रत्यक्षात येऊ शकतो. अर्थात त्याकरिता विरोधकांमधील सर्व घटक पक्षांना व त्यांच्या नेत्यांना आपापले इगो बाजूला ठेवावे लागतील. ते बाजूला ठेऊन सर्वशक्तीनिशी व एकजुटीने लढण्यासाठी ते सज्ज झाले, तरच सामना अटीतटीचा होईल, असे म्हणता येईल. हे सगळे समीकरण जुळवून आणणे, वाटते तितके सोपे नाही. नितीशकुमार हेही कसलेले राजकारणी आहेत, यात शंका नाही. परंतु, त्यांचा मुकाबला साम, दाम, दंड, भेद अशा सर्व आयुधांनिशी तैनात असलेल्या भाजपाशी आहे, हे त्यांनाही विसरून चालणार नाही. आगामी काळात कोण कशी व्यूहरचना रचतो नि हेतू साध्य करतो, यावरच चित्र अवलंबून असेल.
Previous Articleकालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (50)
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.