सुभाष देशमुखे, कराड
सातारा येथील बाजार समितीच्या भुमिपुजनावरून बुधवारी आमने सामने आलेले खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले हे गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत एकत्र दिसले. पत्रकारांशी संवाद साधताना दोन्ही राजेंच्यातील वाद फार गंभीर नाही असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
कराड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, डॉ. सुरेशबाबा भोसले, शेखर चरेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा झाली आहे. दोघांच्यातील वाद फार गंभीर नाही. असे विषय होत असतात मात्र दोघांच्यातील समन्वयातून हा विषय मार्गी लागेल यात शंका नाही. महसूल विभागाच्या बदल्यांसदर्भात उपमुख्यमंत्री म्हणाले, महसूल विभागात बदल्या झाल्यावर काहीजण मॅटमधे जात असतात. मॅटसमोर राज्यसरकारची बाजू मांडली जाते. त्यातून बदलीचा विषय निकाली निघतो. शेतीपंपाच्या विज बिलाची आकारणी 5 रूपये 86 पैशाने होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, कोणत्याही प्रकारे जादा आकारणी केली जात नाही. 1 रूपये 15 पैसे व 1 रूपये 50 पैसे आकारणी केली जातेय. आपले सरकार हे सबसिडी देत आहे त्यामुळे असे कोणतेही जादा आकारणीचा विषय राहिलेला नाही.
मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मौन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्तार कधी होईल यावर फारसे बोलणे टाळत योग्यवेळी होईल असे उत्तर दिले.