येळ्ळूर ग्रामस्थातून संताप : कंत्राटदार धारेवर : पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा
येळ्ळूर : कोट्यावधी रुपये खर्च करून येळ्ळूर येथे जलजीवन योजना राबविण्यात आली. मात्र ही पाणी पुरवठा योजना पहिल्या टप्प्यातच अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. गावामध्ये काही भागामध्ये नळांना पाणीच येत नसल्याने नागरिकांतून आणि महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील व इतर सदस्यांनी कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर येळ्ळूरवासीय गप्प बसणार नाहीत, असा इशारा दिला आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जलजीवन योजना राबविण्यासाठी कोट्यावधी रुपये सरकारने मंजूर केले. मात्र कंत्राटदाराने योग्य प्रकारे काम केले नसल्यामुळे ही योजनाच अपयशी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या योजनेतील काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले. कोट्यावधी रुपयांमधील मोजकीच रक्कम खर्च करण्यात आली आहे. त्यामुळेच ही योजना कुचकामी ठरू लागली आहे. य् ाावेळी या परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 6 कोटी रुपये या योजनेसाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यामधील किती रक्कम खर्च केली असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे. गावची लोकसंख्या 25 हजारांहून अधिक आहे. मंजूर झालेल्या रकमेमध्ये उत्तम दर्जाचे पाईप घालून ही योजना यशस्वी करता आली असती. मात्र केवळ मनमानीपणा आणि कंत्राटदाराचा हेकेखोरपणामुळे ही योजना अपयशी ठरली आहे. अजून ही योजना पूर्णपणे सुरूही झाली नाही. असे असताना ती बंद पडल्याचे दिसू लागले आहे.
नळाला पाणी नसल्याने संताप
पाणी नळाला येत नसल्यामुळे येळ्ळूर गावातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि जिल्हा पंचायतच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यावेळी ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रुपा पुण्यण्णावर, दलित संघटनेचे नेते लक्ष्मण छत्र्याण्णावर, प्रमोद सुर्यवंशी, भीमराम पुण्यण्णावर, पीएचई विभाग अधिकारी कंत्राटदार व ग्रामस्थ उपस्थित होते.
काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे…!
महात्मा फुले गल्ली, इंदिरानगर या परिसरात पाणीच येत नाही. याचबरोबर गावातील इतर भागातही पाणी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे ग्रामस्थांनी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांना याची माहिती दिली. त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता योग्य प्रकारे पाईप लाईन घातली गेली नाही. त्यामुळेच पाणी येत नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी कंत्राटदाराला बोलावून घेण्यात आले. त्यांच्या समोर नळांना पाणी येत नसलेली माहिती दिली गेली. अनेकवेळा तक्रार करून देखील कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.