मुरगुड,प्रतिनिधी
मुरगुड शहरासह शिंदेवाडी व यमगे गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव आज पहाटे ४.३० तुडुंब होऊन ओव्हरफ्लो झाला.यामुळे मुरगूडसह तिन गावांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे.अलिकडे तलावाच्या पाण्याची पातळी १३ फुटापर्यंत निच्चांकी खालावली गेली होती.तलावाची ३७.३ फूट पाणीपातळी झाल्यानंतर तलाव ओव्हरफ्लो होतो.
सर पिराजीराव तलावात १९२३ पासून पाणीसाठा केला जातो. तलावाच्या १०० वर्षाच्या इतिहासात ९५ वेळा हा तलाव ओव्हर फ्लो झाला.१९७२, १९८७, २००१ व २००३ साली तलाव भरला नाही. २०१५ मध्ये तलावात केवळ २५.९ फूट इतकेच पाणी साठले होते.या काळात मुरगूड दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागून तिव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते.अलिकडील काही वर्षापासून पाणी बचतीचा प्रयोग म्हणून मुरगूड शहरात आठवड्यातुन एक दिवस ( गुरूवार ) ड्राय डे पाळला जातो.तर तलाव प्रशासन शेतीसाठी दर सोमवार व मंगळवार ड्राय डे पाळते.
सांडव्यावर उड्डाणपूल हवा!
तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतरचे पाणी सांडव्यावरून बाहेर पडते.मात्र हा सांडवा मुरगुड -कापशी रोडलगत असल्यामुळे जुलै महिन्यात सुरू झालेला हा ओव्हरफ्लो ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत अव्याहतपणे वाहत असतो.त्यामुळे मुरगुड -कापशी रस्त्याचा 300 मीटरचा भाग रस्ता निसरडा होऊन अनेक दुचाकीस्वार व पादचारी जायबंदी होत असतात. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन तलाव प्रशासनाने या सांडव्यावर ‘दिवंगत विक्रमसिंह घाटगे’यांच्या नावाने उड्डाणपूल उभा करावा अशी मागणी होत आहे.