कृष्णात चौगले, कोल्हापूर
काम बोलतंय…! ही टॅगलाईन घेऊन कोल्हापुरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तरदायित्व सभेत विकासकामांचा ‘अजेंडा’ आणि पुरोगामित्वाचा ‘कवटाळा’ घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. उत्तरदायित्व सभा ही कोणाला उत्तर देण्यासाठी अथवा ईर्ष्या करण्यासाठी नसून आमचे उत्तरदायित्व बेरोजगार युवक, महिला सुरक्षा, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी असल्याची भूमिका प्रमुख नेत्यांनी भाषणात स्पष्ट केली होती.तरीही शरद पवार यांच्या साक्षीने ज्यांनी अजित पवार गटातील नेत्यांवर कठोर प्रहार केले होते, त्यांना या सभेतून खरमरीत उत्तर देण्यात आले.या आरोप-प्रत्यारोपातून मात्र कोल्हापूरचा गुळ आणि कोल्हापूरी पायताणाचा चांगलाच उद्धार झाला.पुरोगामित्वाचा विचार पुढे नेण्याचे अभिवचन देत,विकासकामे गतीमान करण्यासाठी कटीबद्ध असल्याचा शब्द या सभेच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना मिळाला.
राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर गेल्या काही दिवसात शरद पवार यांच्या सभेत काही नेत्यांनी स्वार्थ आणि दबावापोटी अजित पवार महायुतीसोबत गेल्याचे आरोप केले होते. पण लोक कल्याणकारी कामांच्या दबावापोटी आणि रखडलेल्या विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठीच सत्तेत सहभागी झाल्याचे स्पष्ट करून अजित पवार यांनी आरोपांचे खंडन केले.तसेच दादांनी राष्ट्रवादीचे पुरोगामित्व भाजपच्या चरणी अर्पण केल्याचा आरोप शरद पवार गटातील काही नेत्यांनी केला होता.पण शिवरायांचा आदर्श आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामित्वाचा वारसा चालविणार असल्याचे स्पष्ट करून दादांनी आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिले.
गोंधळलेल्या कार्यकर्त्यांना मिळाली दादांची ‘पॉवर’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर नेत्यांची विभागणी झाली असली तरी तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र द्विधा मनस्थिती होती.‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यामुळे अनके कार्यकर्त्यांनी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली होती.पण दादांच्या सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांना ‘पॉवर’ मिळाली असून त्यांची दिशा स्पष्ट झाली आहे.
मोदी, शहांचा कौतुक सोहळा अन् गतीमान विकासाची पुष्टी
राष्ट्रवादीच्या उत्तरदायित्व सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्या अनेक निर्णयांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले. साखर कारखान्यांचा रद्द केलेला आयकर,शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर दिल्यास त्यावर लावला जाणारा कर रद्द केल्याचा निर्णय,तसेच जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या अनेक धोरणांमुळे देशाची जगातील अन्य देशात उंचावलेली प्रतिमा या बाबींचा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी आवर्जून उल्लेख केला.त्यामुळे या कणखर नेतृत्वाखाली राज्याचा विकास गतीमान करण्यासाठीच महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाल्याची पुष्टी सभेत देण्यात आली.
कोल्हापूरकरांना मिळाला विकासकामांचा शब्द
‘अजितदादा जे बोलतात, ते करून दाखवतात’ असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितले जाते.त्यामुळेच सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात लावलेल्या सर्व फलकांवर दादांच्या फोटो शेजारी ‘कामाचा माणूस’असा ठसठशीत उल्लेख केला होता.उत्तरदायित्व सभेच्या माध्यमातून दादांनी कोल्हापुरातील प्रलंबित विकासाकामांचा लेखाजोखा स्पष्ट करून ती पूर्ण करण्यासाठी राज्याची तिजोरी खुली करण्याचा शब्द दिला.अंबाबाई व जोतिबा तिर्थक्षेत्र विकास,वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान,पंचगंगा प्रदुषणमुक्ती, कोल्हापूर शहराची हद्दवाढ,आयटी पार्क,शहरातील अंतर्गत रस्ते,शहरातील तालमींना निधी,केएमटी बसच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठीचा प्रस्ताव,काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी निधीची तरतूद,शिवाजी विद्यापीठास निधी,रंकाळा तलाव सुशोभिकरण आदी अनेक विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे दादांनी जाहीरपणे सांगितले. त्यामुळे या सभेच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना विकासकामांचा शब्द मिळाला असला तरी तो प्रत्यक्ष पूर्णत्वास कधी येणार ?याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष आहे.
जातीय सलोखा टिकवण्याची ग्वाही
काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरात झालेल्या जातीय दंगलीचा संदर्भ घेत यापुढे जातीय सलोखा बिघडू नये यासाठी महायुती सरकार प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अजित पवार यांनी सभेतून दिली.या विधानातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप,शिवसेनेसोबत गेला असला तरी पुरोगामित्व विसरणार नसल्याचा निर्वाळा दिला.