कुलगुरू प्रा. विद्याशंकर एस., व्हीटीयूमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन
बेळगाव : थोर विज्ञानी सी. व्ही. रामन् यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अनेक सुधारणा झाल्या आहेत. सध्या विज्ञानाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले पाहिजेत. रोजच्या जीवनात याचा वापर व्हावा या दृष्टीने याचा उपयोग होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विज्ञानामुळे देशाची विविध क्षेत्रात भरभराट होत आहे, असे प्रतिपादन व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. विद्याशंकर एस. यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात (व्हीटीयू) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे सध्याच्या घडीला मोठे बदल घडत आहेत. देशाच्या विकासामध्येही विज्ञानाचे मोठे महत्त्व आहे. आर्थिक, औद्योगिक, आरोग्य, शेती आदी क्षेत्रामध्ये विज्ञानाने मोठी प्रगती साधली आहे. वैज्ञानिक शिक्षणामुळेच संशोधन आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्यात अधिक मदत झाली आहे. औद्योगिकरणाला चालना मिळाल्यामुळेच भारत आज जागतिक दर्जावर पुढारलेला देश म्हणून समोर येत आहे. विज्ञानाचे महत्त्व जाणून घेऊन नागरिकांना रोजच्या जीवनात विज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज
विद्यार्थ्यांनी समाजाचा बारकाईने विचार करून निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यावर वैज्ञानिक दृष्टीकोन शोधून काढला पाहिजे आणि देशाच्या विकासात हातभार लावला पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्हीटीयूचे निबंधक प्रा. बी. ई. रंगस्वामी सी. व्ही. रामन् यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. सरस्वती भुसनूर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी एम. ए. सपना, प्रा. एस. एल. देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. नंदा हिरेमठ यांनी आभार मानले.