Jayant Patil News : सध्या सरकारकडून माझ्या बदनामीची मोठी मोहीम सुरू आहे. माझ्या चौकशीचा फार्स सरकारने चालवला असला तरी यापुढे असली आगळीक आपण खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे. पाटील सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून इस्लामपूर मतदार संघातील विविध गावांना भेटी देऊन विकास कामांची उद्घाटने, दाखले वाटप आदी कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
मिरज तालुक्यातील सावळवाडी गावातील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी राज्यातील सरकारने आपल्या विरोधात षडयंत्र रचलेले आहे हे जनता जाणून आहे. राजारामबापू सहकारी बँकेत कोणताही घोटाळा झालेला नाही. तरीही इडीची चौकशी लावून आपल्याला बदनाम करण्याचा उद्योग करत आहेत असा आरोप केला. या बँकेचा मी साधा संचालक सुध्दा नाही. तरीही ईडी चौकशी करून दिशाभूल केली जात आहे. हे आता कदापि खपवून घेतले जाणार नाही. राज्यात पुन्हा महविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हा मतदार संघातील सावळवाडी सारख्या गावांना किमान दहा कोटीचा विकास निधी देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.