प्रतिनिधी /बेळगाव
आरपीडी रोड आणि खानापूर रोडचा विकास करण्यात आला. मात्र खानापूर रोड शेजारील सांडपाण्याचे निवारण करण्यात आले नव्हते. आरपीडी चौकात खड्डय़ांमध्ये सांडपाणी सोडण्यात आले होते. परिणामी पावसाचे पाणी आणि सांडपाणी आरपीडी चौकातील रस्त्यावरून वाहत होते. अखेर या समस्येचे निवारण करण्याचे काम मंगळवारी सायंकाळपासून हाती घेण्यात आले आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना बनवायचे काम महापालिकेतर्फे सुरू करण्यात आले.
आरपीडी चौकाशेजारी खड्डा काढून त्यामध्ये आरपीडी रोडशेजारील गटारीचे सांडपाणी जिरविण्यात येत होते. पण पावसाळय़ात पाण्याचे प्रमाण वाढल्याने सदर खड्डय़ातील पाणी चौकातील रस्त्यावरून वाहत होते. परिणामी जवळच असलेल्या बस थांब्यावर येऊन नागरिकांना आणि दुचाकी वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. खानापूर रोड महत्त्वाचा असून वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. ये-जा करणाऱया वाहनांमुळे चौकातील रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी बसप्रवासी आणि वाहनधारकांच्या अंगावर उडत होते. परिसरात विविध शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे सांडपाण्याचा त्रास आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. याबाबत महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. पण रस्त्यांचा विकास सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आल्याने महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले होते. या समस्येबाबत सातत्याने तक्रार केली होती. पण महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने कानाडोळा केला होता. येथील समस्येबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याची दखल घेऊन मंगळवारी सांडपाण्याचा निचरा करण्याच्यादृष्टीने आवश्यक कारवाई हाती घेण्यात आली.