जिल्हा पंचायत-सामाजिक वनीकरण विभागाने उपक्रम राबविण्याची आवश्यकता : भूजलसाठा वाढवून जमिनीची धूप थांबविण्यासाठी पर्याय
प्रतिनिधी /बेळगाव
भूजलसाठा वाढविणे आणि जमिनीची धूप थांबविणे हा उदात्त हेतू लक्षात घेऊन वृक्ष लागवड मोहीम महत्त्वाची असते. मागील काही वर्षांपासून रस्त्याशेजारी वृक्षारोपण केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात ही मोहीम आता नदी, नाल्यांच्या काठावर राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून पावसाने बऱयापैकी साथ दिली होती. मात्र यावेळी पाऊस कमी होत आहे. त्यामुळे जर नदी-नाल्यांच्या काठावर वृक्ष लागवड केल्यास जमिनीची धूप टाळण्यास मदत होणार आहे. याकडे आता जिल्हा पंचायत व सामाजिक वनीकरण विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मार्कंडेय नदीसह बळ्ळारी नाला व इतर नाल्यांच्या कडेला वृक्ष लागवड करण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्हा पंचायत व सामाजिक वनीकरण विभागाने मार्कंडेय नदीकाठावर वृक्षारोपणाची नवी मोहीम सुरू केली होती. मार्कंडेय नदीकाठावर तब्बल 5 हजार रोपटी लावली जाणार होती. 10 कि.मी. अंतरावरील या वनीकरणातून हरित नदीकाठ बनविण्याबरोबरच पर्यावरणाशी संबंधित इतर समस्या सोडविण्यासाठी पाऊलही उचलण्यात आले. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे काम अर्धवट राहिले आहे. याचबरोबर नदीकाठावर लावण्यात आलेले वृक्ष काही शेतकऱयांनी तोडल्याचेही निदर्शनास आले आहे.
वृक्ष संवर्धनासाठी शेतकऱयांनी मदत करणे आवश्यक
वृक्षसंवर्धन, नदीकाठ आणि परिसराचे जतन करणे ही महत्त्वाची बाब आहे. पावसाळय़ात नदीचे पाणी वाढले की जमिनीची धूप होते. माती नको त्या ठिकाणी वळली जाते. यासाठी वृक्षारोपण करणे महत्त्वाचे असून नदीकाठावर रोपे लावली की त्यांची मुळे जमीन घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे पूर आला तरी जमिनीची धूप थांबते. याचा मोठा फायदा शेतकऱयांनाही होतो. मात्र याकडे शेतकरीही गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे आता तरी वृक्ष लागवड करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
नदीकाठावर विशिष्ट प्रकारच्या झाडांची लागवड करणे गरजेचे
नदीकाठावर विशिष्ट प्रकारच्या झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. विशेष करून जांभूळ आणि बांबू या वृक्षांचा यामध्ये मोठय़ा प्रमाणात समावेश केल्यास सोयीचे ठरणार आहे. सध्या पाऊस कमी आहे. त्यामुळे आतापासून जरी ही मोहीम हाती घेतली तर याचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक झाड तीन मीटरचे अंतर ठेवून लावणे गरजेचे आहे. त्यामुळे ती वाढण्यास मदत होते. जर ही मोहीम यशस्वी झाली तर पशु, पक्ष्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे याकडे आता लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
वृक्ष लागवडीमुळे भूजलसाठा वाढण्यास मदत होणार
नदीकाठावर शेती असणाऱया काही शेतकऱयांनी या उपक्रमाला विरोध केल्यामुळे काहीअंशी ही मोहीम बारगळली होती. या वृक्ष लागवडीमुळे भूजलसाठा वाढणार आहे. यामुळे नदीकाठावरील शेत जमिनींची सुपिकता वाढली जाणार असून शेतकऱयांचाच फायदा आहे, अशी जनजागृती प्रशासनाच्या वतीने करणे आवश्यक आहे. बहुतेक ठिकाणी नागरिकांकडून नदीच्या काठावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे नदीच्या पात्राची रुंदी कमी होऊन पुराचा धोका वाढला आहे. मोजमाप करून वृक्ष लावल्यामुळे नदीचे मुख्य पात्र संरक्षित होणार असून या पुढील काळात अतिक्रमण करणाऱयांवर कारवाईची गरजही काही जाणकारांनी व्यक्त केली आहे.
2016 मध्ये राबविण्यात आली होती मोहीम
उद्योग खात्रीतून आता प्रत्येक रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड केली जात आहे. मात्र संबंधित रोपटी जगविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. दरम्यान नदी, नाल्यांशेजारी वृक्ष लागवड करणारी मोहीम ही 2016 मध्ये जिल्हा पंचायतीच्या वतीने राबविण्यात आली होती. या प्रकारची वृक्षारोपण मोहीम मार्कंडेय नदीच्याच पात्रावर राबविण्यात आली होती. त्यानंतर उन्हाळय़ात नदीपात्रात पाणी टिकून राहण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते. मात्र त्यानंतर या वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच ही मोहीम फोल ठरली आहे.