शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे : आमिषांना बळी पडू नये
प्रतिनिधी/ बेळगाव
रिंगरोडविरोधात शेतकऱ्यांनी भव्य चाबुक मोर्चा काढला. त्याला आपला तीव्र विरोध असल्याचे सर्व ताकदीनिशी दर्शविले होते. तरीदेखील जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्याप याबाबत कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे झाले आहे.
हलगा-मच्छे बायपासनंतर रिंगरोड करण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता. त्याविरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याठिकाणी त्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र आता रिंगरोडसाठी जमीन घेण्यात येणार असल्याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले. त्यामुळे शेतकरी खडबडून जागे झाले होते. शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हरकती नोंदविल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. मात्र आता न्यायालयीन लढाई लढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णवर यांनी हे नोटिफिकेशन जारी केले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या रस्त्यामध्ये जाणार आहेत. केवळ राजकीय व्यक्तींना याचा लाभ व्हावा, यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यापूर्वी शेतकऱ्यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांवर ही कुऱ्हाड कोसळली आहे.
सदर रस्ता 69.387 कि.मी.चा होणार आहे. शहराला लागून असलेल्या 32 गावांतून हा रस्ता चार ते सहापदरी करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो एकर सुपीक जमीन रस्त्यामध्ये जाणार आहे. एकूणच बेळगाव परिसरातील शेतकरी हा भूमीहीन होणार आहे. आता न्यायालयीन लढाई लढण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, जेणेकरून सर्वांनाच त्याचा त्रास होईल, याची दक्षताही घेतली पाहिजे.
रिंगरोडमध्ये अगसगा, आंबेवाडी, बाची, बहाद्दरवाडी, बिजगर्णी, गोजगे, होनगा, कडोली, काकती, मास्तमर्डी, कलखांब, कल्लेहोळ, कमकारट्टी, कणबर्गी, कोंडसकोप, मास्तमर्डी, मण्णूर, मुचंडी, मुतगा, नावगे, संतिबस्तवाड, शगमनट्टी, शिंदोळी, सोनट्टी, येळ्ळूर-सुळगा, तमनायकनट्टी-धामणे, तुरमुरी, उचगाव, वाघवडे, यरमाळ, येळ्ळूर, झाडशहापूर या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यामध्ये जाणार आहेत. या सर्व गावांची नावे नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहेत. यामुळे सर्वच गावांतील सुपीक जमीन या रस्त्यात जाणार असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा लढाई लढावी लागणार आहे.
रिंगरोडबरोबरच राष्ट्रीय महामार्ग रस्त्याला लागून ट्रॅक बनविण्यात येणार आहे. त्यासाठी होनगा येथील 100 एकर सुपीक जमीन घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वात जास्त होनगा व बेन्नाळी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनीही जोरदार विरोध केला आहे. आता रस्त्यावरील लढाई लढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कायदेशीर लढाई लढण्याबाबतही विचार करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तेव्हा संघटितपणे ही लढाई लढणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज-अॅड. भैरू टक्केकर
रिंगरोडमध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. जमीन गेल्यानंतर शेतकरी देशोधडीला लागणार आहे. पैसे देतो असे आमिष दाखविले जाईल. मात्र त्या आमिषाला कोणीही बळी पडू नये. जर अशाप्रकारे कोणीही आमिष दाखवत असेल तर त्याची माहिती वकिलांबरोबरच संघटनांना द्यावी. जेणेकरून त्याला बळी पडता येणार नाही. कायदेशीर लढाईदेखील लढावीच लागणार आहे. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याने त्याबाबत तयारी करणेही गरजेचे असल्याचे अॅड. भैरु टक्केकर यांनी सांगितले.