केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ः इंचभरही जमीन सोडणार नसल्याचा चीनला इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
भारताच्या एका इंच जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही. आपल्याला भारत-चीन सीमेची अजिबात चिंता नाही. आमचे आयटीबीपीचे ‘हिमवीर’ जवान सीमेवर तैनात आहेत. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आमच्या जमिनीवर एक इंचही अतिक्रमण करण्याची कोणाची हिंमत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले.
बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ातील अवती येथे निर्माण करण्यात आलेल्या केंद्रीय गुप्तचर प्रशिक्षण संस्थेच्या इमारत उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी चीन सीमेवर तयारीनिशी सज्ज आहे, असे विधान केले होते. त्यावर अमित शाह यांनी उत्तर दिल्याचे मानले जात आहे. आयटीबीपी हे देशातील सर्वात कठीण भागात काम करणारे सुरक्षा दल आहे. उणे 42 अंश तापमानात देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी किती दृढ मनोबल राखावे लागते याची आपण कल्पनाही करू शकत नाही, असे ते म्हणाले.
आयटीबीपीच्या जवानांचे कौतुक
आयटीबीपीने आपल्या स्थापनेच्या काळात कठीण भौगोलिक परिस्थिती आणि कठीण भागातही चांगली कामगिरी केली आहे. आपण स्वतः जम्मू काश्मीर आणि लडाखला भेट दिली तेव्हा तेथील लोक आयटीबीपीच्या जवानांना हिमवीर म्हणतात, असे दिसून आले. ही उपाधी पद्मश्री आणि पद्मभूषण पेक्षाही मोठी आहे, कारण सैनिकांना ही उपाधी सरकारने नव्हे तर देशातील जनतेने दिली आहे, असे कौतुकही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
9 डिसेंबरला तवांगमध्ये झटापट
9 डिसेंबर रोजी अरुणाचलच्या तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. 17 हजार फूट उंचीवर असलेली भारतीय चौकी हटवण्यासाठी 600 चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. हे पोस्ट यांगत्सेमध्ये आहे. भारतीय जवानांनी चिनी सैन्याचा पाठलाग करत त्यांना रोखून धरले होते. यादरम्यान झालेल्या झटापटीत भारतीय लष्कराचे 6 जवान जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.