3 जुलैपासून विधिमंडळ अधिवेशनाला प्रारंभ : जनतेमध्ये कमालीची उत्सुकता
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 3 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. तर अर्थखात्याची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या 7 जुलै रोजी नवा अर्थसंकल्प मांडतील. त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी राज्यातील जनतेमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अर्थसंकल्पीय पूर्वतयारी बैठकांना अद्याप प्रारंभ झालेला नाही. अर्थसंकल्पाची व्याप्ती किती असेल, याविषयी आताच सांगणे शक्य नाही. भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मांडलेला अर्थसंकल्प 3,30,714 कोटी रुपयांचा होता. मात्र, आपल्या सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाची व्याप्ती किती असेल, हे सांगण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नकार दिला.
अर्थसंकल्पावर 6 दिवस चर्चा होईल. सर्वसामान्यपणे राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सिद्धरामय्या यांनी नवा अर्थसंकल्प मांडणार असल्याची घोषणा केली होती.
सोमवारी दावणगेरे जिल्हा पंचायतीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी सिद्धरामय्या येथे आले होते. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठ आमदार शामनूर शिवशंकरप्पा आणि मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. या निमित्ताने भोजनावळीचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यासंबंधी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना माहिती देऊन मंजुरी मिळविण्यात येईल.