पंतप्रधानांनी अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद मोदींनी शुक्रवारी पर्यटन मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले आहे. भारतात पर्यटन क्षेत्राला नवी उंची मिळवून देण्यासाठी नव्या कल्पना अंमलात आणाव्या लागतील आणि दीर्घकालीन योजना आखाव्या लागणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
सध्याचा ‘नवा भारत नव्या कार्यसंस्कृती’सह वाटचाल करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाची मोठी प्रशंसा झाली आहे. देशातील लोकांनी या अर्थसंकल्पावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जेव्हा एखादे पर्यटन स्थळ विकसित करण्याचा मुद्दा असतो, तेव्हा तीन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असते. स्थळाच्या विकासाच्या शक्यता, तेथे पोहोचण्यासाठीच्या वाहतूक सुविधा आणि पर्यटनवृद्धीसाठीचा प्रचार हे तीन मुद्दे विचारात घेत पावले उचलावी लागत असल्याचे मोदी म्हणाले.
भारतात पर्यटन क्षेत्राची व्याप्ती अत्यंत मोठी आहे. शतकांपासून आमच्याकडे यात्रांचे आयोजन होत राहिले आहे, आमच्या सांस्कृतिक-सामाजिक जीवनाचा त्या हिस्सा राहिल्या आहेत. जेव्हा कुठलीच साधने नव्हती तेव्हाही लोक यात्रांवर जात होते. चारधाम यात्रा, ज्योतिर्लिंग यात्रा, 51 शक्तिपीठांची यात्रा अशा अनेक यात्रा आमच्या श्रद्धास्थानांना जोडत होत्या. आमच्या येथे होणाऱया यात्रांनी देशाच्या एकतेला मजबूत करण्याचे काम केले असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
यात्रांच्या या पुरातन परंपरेनंतरही दुर्दैवाने या स्थळांवर कालानुकूल सुविधा वाढविण्यावर लक्ष देण्यात आलेले नाही. पूर्वी शेकडो वर्षांचे पारतंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर दशकांमध्ये या स्थळांच्या राजकीय उपेक्षेने देशाचे मोठे नुकसान केले आहे. आता हा नवा भारत ही स्थिती बदलत असल्याचे मोदी म्हणाले.
भारतातील विविध स्थळांवर नागरी सुविधा वाढविण्यात आल्यास, डिजिटल कनेक्टिव्हिटी उत्तम असल्यास, हॉटेल-रुग्णालये चांगली असल्यास, अस्वच्छता दूर केल्यास, उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्यास भारताच्या पर्यटनक्षेत्रात अनेक पट वृद्धी होऊ शकते. यात्रेकरूंसाठीच्या सुविधा वाढल्यावर त्यांच्या संख्येत कशाप्रकारे मोठी वृद्धी होते हे आम्ही देशात पाहत आहोत असे विधान मोदींनी केले आहे.
आमची गावं देखील पर्यटनाचे केंद्र ठरत आहेत. पायाभूत विकास वेगाने होत असल्याने दुर्गम गावे देखील पर्यटनाच्या नकाशावर येत आहेत. केंद्र सरकारने सीमावर्ती गावांसाठी ‘व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज’ योजना सुरू केली आहे. अशा स्थितीत होम स्टे, छोटी हॉटेल्स आणि अन्य अनेक व्यवसायांसाठी लोकांना अधिकाधिक सहाय्य करण्याचे काम करावे लागणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.