पाणीटंचाईच्या समस्येमुळे शहरातील पाणीपुरवठा नियोजनासाठी खबरदारी
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा कमी होत असतो. एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते. या दरम्यान जादाच्या नळजोडण्या घेऊन समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न ग्राहक करीत असतात. त्यामुळे एलअॅण्डटी कंपनीने यंदा फेब्रुवारीपासूनच नळजोडणी देणे बंद केले आहे. दि. 15 जूननंतरच नवीन नळजोडणीस मंजुरी मिळणार आहे. शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. विशेषत: मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. विशेषत: या तीन महिन्यातच सर्वत्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. तर शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा एरवी मे अखेरपर्यंत पुरतो. जर पावसाचे प्रमाण कमी झाल्यास किंवा पाणीसाठा कमी असल्यास पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे खबरदारी म्हणून शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात येते. सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो.
फेब्रुवारीपासूनच बंदी
पाणीटंचाईच्या समस्येवर काही ग्राहक नामी शक्कल लढवित असतात. तात्पुरत्या काळासाठी नवीन नळजोडणी घेऊन पाण्याची व्यवस्था करतात. पण याचा परिणाम अन्य ग्राहकांवर होतो. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळ तसेच महापालिकेकडून एप्रिल-मे अशा दोन महिन्यांत नवीन कनेक्शनला परवानगी दिली जात नव्हती. पण यंदा एलअॅण्डटी कंपनीने फेब्रुवारीपासूनच नवीन नळजोडणीला बंदी घातली आहे. नव्याने नळजोडणी देणे बंद करण्यात आले असून जूननंतरच नवीन नळजोडणीस मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे शहरवासियांना नव्या नळजोडणीसाठी 15 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. गरजू आणि ज्या ठिकाणी रस्त्याचा विकास केला जात आहे, अशा ठिकाणी नळजोडणी केली जाते. पण पाणीपुरवठा जूननंतरच सुरू केला जातो. घरोघरी नळजोडणी करून त्याला तोटी लावण्यात येते. त्यामुळे जरी नळजोडणी मिळाली तरी ती जूनपर्यंत वापरता येत नाही.