संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचे मत : अ. भा. मराठी साहित्य परिषद-मराठा मंदिर बेळगाव आयोजित संमेलन उत्साहात
बेळगाव : विवेक आणि विचार ही प्रगतीला, विकासाला कारणीभूत ठरणारी दोन महत्त्वाची हत्यारे आहेत. या हत्यारांचा वापर करून सामान्य माणसांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. लेखकांनी याच हत्यारांच्या माध्यमातून ‘मनुष्य कल्याण’ या भूमिकेतून लिहिते व्हायला हवे, असे विचार साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव आयोजित मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलननगरीमध्ये पॉलिहैड्रॉन व्यासपीठावरून अध्यक्ष या नात्याने डॉ. ढेरे बोलत होत्या.
आपले पूर्वसुरी प्रतिभावंतच
त्या म्हणाल्या, सर्वसामान्य माणूस ही फार मोठी शक्ती असून भावनाशील, स्वत:च्या जीवंतपणासह संवेदनशील माणसांची साखळी निर्माण होणे काळाची गरज आहे. विसंवादाच्या, जाती-पातीच्या, सर्व भेदाभेदाच्या भिंती माणसांच्या मोकळ्या बोलण्यांनी पडायला हव्यात. महिला दिन जवळ आला आहे, त्या अनुषंगाने विचार करता आज एकही क्षेत्र महिलांना वंचित राहिलेले नाही. परंतु, पूर्वीच्या महिलांनी मौखिक साहित्याची फार मोठी परंपरा निर्माण केली आहे. आपले पूर्वसुरी अनक्षर असतील परंतु, जगण्याच्या अनुभवामुळे ते प्रतिभावंतच होते. महिलांनी कर्तृत्व गाजविले असले तरी असुरक्षितता आणि अत्याचार तितकेच वाढले आहेत. ते कमी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. माणूस हा विचारशील प्राणी आहे. निसर्गाच्या साखळीतील आपण एक महत्त्वाचा घटक आहोत. पण निसर्गाची आपल्याकडून प्रचंड हेळसांड होत आहे. जो पैसा युद्धाला वापरला जातो, तो पर्यावरणासाठी वापरायला हवा. मात्र, आपण या सर्वांकडे दुर्लक्ष करतो आहोत. अन्य प्राण्यांपेक्षा माणूस वेगळा आहे, कारण तो विचार करतो. तो भावनाशील आहे, संवेदनशील आहे, तर मग आपण परस्परांशी बांधले का जात नाही? याचा विचार करायला हवा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आपण विचार करत नाही, कारण आपण वाचत नाही. मराठी टिकविण्याची शिक्षक-पालकांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी पाठ्यापुस्तकांच्या पलीकडचे जग पिढीला दाखवायला हवे. परस्परांच्या जवळ येणे जेथे घडते, तेथे माणुसकीचे दर्शन साहित्यात आणण्याची प्रेरणा साहित्यिकाला मिळते. माणूस हाच सर्व साहित्याचा केंद्रबिंदू असायला हवा. साहित्याला मानवी मूल्यांची जोड जेथे मिळते, तेच साहित्य टिकून राहते आणि ‘मानवाच्या कल्याणासाठी’ या भूमिकेतून साहित्यिकाने लिहीत राहायला हवे, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी आर. एम. चौगुले यांनी संमेलननगरीचे, सुरेश रेडेकर यांनी ग्रंथदालनाचे, शिवाजी अतिवाडकर यांनी पॉलिहैड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन केले. डॉ. नितीन राजगोळकर यांनी ग्रंथपूजन केले. छत्रपती शिवराय, संत ज्ञानेश्वर, शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन वाय. बी. चव्हाण, रमेश पाटील, प्रकाश मरगाळे, दिगंबर पवार, प्रदीप अष्टेकर व ए. के. पाटील यांनी केले.
मराठीसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक
मराठा मंदिरचे चेअरमन व उद्योजक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी भाषा टिकविण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील यांनी संमेलनाचा हेतू स्पष्ट केला. डी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी स्वागत केले. संमेलनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रणजित चौगुले व रोशनी हुंदरे यांनी केले.