विषाणू आता निष्प्रभ झाल्याचे नव्याने सांगण्याची गरज उरली नाही. नवे व्हेरियंट येऊन देखील मानवी शरीरावर गंभीर परिणाम करत नसल्याच्या नोंदीतून ते वारंवार समोर येत आहे. बुस्टर डोस नंतरही दरवर्षी डोस घेण्याची गरज असल्याची शक्यता काही तज्ञ वर्तवित आहेत. कारण अद्यापही कित्येक जणांनी पहिला तसेच दुसरा डोस बुडवला असून बुस्टर डोसपासून दूर आहेत. डोस टाळलेल्या शरीरात विषाणू राहू शकतो. त्यामुळे संपूर्ण कोरोना आणि त्याचे व्हेरियंट जाईपर्यंत डोस घेण्याची गरज लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते. ही शक्यता टाळण्यासाठीच लसीकरणाच्या अमृत महोत्सव मोहिमेला यशस्वी करण्याची जबाबदारी आता प्रत्येकाची आहे….
राज्यातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायी वृत्त आहे. त्यात शेवटच्या व्यक्तिपर्यंत लसीचा डोस पोहचण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आलीय. याने कोरोना शेवटचे श्वास मोजू लागेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र यात नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने चिंता किंचित वाढताना दिसून येते. राज्यात प्रामुख्याने बीए.4, बीए.5 तसेच बीए.2.75 व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात आतापर्यंत बीए.4 आणि बीए.5 रुग्णांची संख्या 132 तर बीए.2.75 रुग्णांची संख्या 57 झाली असल्याचे आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो. तर जिल्हानिहाय आकडेवारीनुसार बीए.4 आणि 5 व्हेरियंटचे पुण्यात 84, मुंबई 33, नागपूर, ठाणे, पालघर प्रत्येकी 4, तर रायगड 3़, तसेच बीए.2.75 व्हेरियंटचे पुणे येथे 37, नागपूरात 14, अकोलामध्ये 4, तर ठाणे आणि यवतमाळ जिह्यात प्रत्येकी 1 रुग्ण असल्याचे दिसून येते. व्हेरियंट रुग्ण आढळण्यात पुणे, मुंबई आणि नागपूर ही शहरे आघाडीवर आहेत. या रुग्णांच्या जिनॉम परिक्षणाचा कालावधी नक्कीच 15 ते 20 दिवसांपूर्वीचा असतो. तो रुग्ण घरच्या घरी बरा झालेला असल्याने व्हेरियंटचा प्रभाव सौम्य असल्याचे तज्ञ सांगतातही. मात्र व्हेरियंटच्या प्रत्येक रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्राrय आढावा घेण्यात येत असल्याचेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. मुळात कोरोना रुग्ण संख्या घटत असताना व्हेरियंटचे रुग्णही आढळणे हे कितपत धोकादायक असू शकते ही शंका उपस्थित होते. यावर कोणत्याही साथजन्य आजारात विषाणूंचे व्हेरियंट येणे हा नैसर्गिक प्रकार आहे. या व्हेरियंटचा प्रभाव सौम्य होत जात असल्याचे मत ज्येष्ठ सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रा. डॉ. रंजन गर्ग मांडतात. कोणत्याही व्हेरियंटची रोगकारक शक्ती विशिष्ट गुणधर्मावर अवलंबून असते. तो नव्याने आला तरी देखील त्याची रोगकारक शक्ती कमी होत गेल्याने मानवी शरीरावर तितकासा परिणाम होत नसल्याचे डॉ. गर्ग स्पष्ट करतात. त्यातूनच सध्या मानवी फुफ्फुस, हृदय वैगेरे अवयवांवर पहिल्या आणि दुसऱया लाटेप्रमाणे परिणाम होत नाही. मानवामध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली की, विषाणू तसेच त्यांच्या उपप्रकारांचा प्रभाव कमी होत जातो. सध्या मानवी शरीरात हर्ड इम्युनिटी आल्याचे स्पष्ट होते आहे. हर्ड इम्युनिटीमुळे मानवी शरीरात नव्याने प्रवेश केलेल्या विषाणूला प्रवेशातच संपवले जाते. कारण शरीरात आधीपासूनच विषाणूची उपस्थिती असते. त्यामुळे व्हेरियंट आले तरी घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ञ सांगत आहेत. सध्या मानवी शरीरात विषाणूसंबंधित 90 टक्के हर्ड इम्युनिटी आली असून सुरु असलेल्या लसीकरणामुळे विषाणू मानवी शरीरावर गंभीर परिणाम करू शकत नसल्याचे वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. सध्या सुरु असलेला लसीकरण अमफत महोत्सव ही मोहीम दक्षता घेण्यासाठी उत्तम मार्ग आहे. अशा लसीचे डोस भविष्यातही सुरूच ठेवावे लागतील असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. कारण सध्या मानवी शरीर कोविड विरोधात लढण्यास 100 टक्के सज्ज झाले असल्याचे सांगण्यात येत असलं तरी देखील हे प्रमाण 60 ते 70 टक्के असू शकतं. त्यामुळे डोस घेत राहिल्यास हर्ड इम्युनिटी चांगल्या टक्क्यांवर म्हणजे 100 टक्क्यांवर पोहचू शकते. त्याचसाठी बूस्टर डोस मोहीम सुरु करण्यात आली.
दरम्यान महामारीच्या कालावधीत नवे व्हेरियंट सतत येत असल्याने त्या व्हेरियंटच्या अनुषंगाने विद्यमान कोविड लसीत बदल करण्याची गरज आहे का अशी शंका देखील विविध पातळीवर उपस्थित केली जात आहे. मात्र लसीत तितकासा बदल करावा लागणारा नसल्याचे प्रा. डॉ. रंजन गर्ग यांनी स्पष्ट केले. कारण लसीतील प्राथमिक प्रोटीन्स पॅक्टर सामाईक असून लसीतील उर्वरित घटक बदलला तरी तितकासा फरक पडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नव्या व्हेरियंटच्या संशोधनासाठी जीनॉम सिक्वेसिंग केले जात आहे. आता भारतात नेमक्याच ठिकाणी जीनॉम परीक्षण केले जात आहे. जीनॉम केल्यावरच नव्या व्हेंरियंटची ओळख होत आहे. मात्र जीनॉम करण्याचे प्रमाण फार कमी आहे. एखाद दुसऱया नमुन्याच्या जीनॉमवरच व्हेरियंट बदलल्याचे निदान करण्यात येत आहे. हजारो लाखो जीन्स आहेत. जीन्समध्ये बदल किती झाला हे पाहण्यासाठी एखाद दुसऱया नमुन्यांचे जिनॉम केले तरी फारसा काही फरक पडत नसल्याचे संशोधक मत मांडत आहेत. व्हेरियंटच्या रोगकारक शक्तित बदल झाल्यास नव्या व्हेरियंटचे निदान करण्यात येईल. मात्र सध्या तपासण्यात येणाऱया नमुन्यांची संख्या समाधानकारक असल्याचे मत मांडण्यात येत आहे. सध्याचे व्हेरियंट रुग्ण नागपूर किंवा पुण्यात सर्वाधिक असल्याचे दिसून येते. मात्र व्हेरियंटचे मूळ परदेशी असल्यास ग्रामीण भागातही याचे रुग्ण कसे आढळून येतात अशी शंका ही नव्याने विचारली जात आहे. यावर मात्र त्या व्हेरियंटच्या आढळण्याच्या देशातील नेमक्या प्रदेशापासून ते इतर देशातील कोणत्याही खेडय़ातील समकक्ष व्हेरियंटचा प्रवास उलगडावा लागेल. हे ट्रकिंग सध्या केले जात नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांत तशा पद्धतीने ट्रकिंग केली जात होते. सध्या मात्र परदेशातील एखाद्या ठिकाणी नवा व्हेरियंट आढळल्यास त्या ठिकाणच्या वातावरणावर देखील त्याचा परिणाम होत असतो. म्हणजेच वातावरणीय परिणामात सुद्धा त्याला गणले जात आहे. जुना व्हेरियंट स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःला बाहेरच्या वातावरणानुसार बदलवत असतो. त्यातून नवा व्हेरियंट निर्माण होतो. तो व्हेरियंट त्या त्या देशातील वातावरणानुसार असतो. मात्र बदललेला व्हेरियंट मानवाला घातकी असू शकतोच असे नाही. सध्या मात्र या नव्या व्हेरियंटमुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र लसीकरण आणि मास्क प्राथमिक उपाययोजना आहेत. यातही लसीकरण उत्तम मार्ग आहे. मात्र तो बेफिकीरीमुळे अवलंबविला जात नाही. मास्क घालायची गरज नाही म्हटल्यावर व्यक्ति बेफिकिर होते. त्यातूनच लसीकरणाचा अमृत महोत्सव सारख्या मोहिमा राबवाव्या लागत आहेत. यात बुस्टर डोस आवर्जुन घ्यावा असे सांगितले जात आहे.
बुस्टर डोस नंतरही दरवर्षी डोस घेण्याची गरज असल्याचे काही तज्ञ सांगत आहेत. कारण अद्यापही कित्येक जणांनी बुस्टर डोस घेतला नाही. तर कित्येकांनी पहिला दुसरा डोसही टाळलेला आहे. अशा व्यक्तिच्या शरीरात त्या विषाणूला आजारपुरक बाबी आढळून घर करु शकतात. त्यामुळे संपूर्ण कोरोना आणि त्याचे व्हेरियंट जाईपर्यंत डोस घेण्याची गरज लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. ही शक्यता टाळण्यासाठीच लसीकरणाच्या अमृत महोत्सव मोहिमेला यशस्वी करण्याची जबाबदारी आता प्रत्येकाची आहे.