‘लिखित माध्यम’ वरील राष्ट्रीय चर्चासत्रात वक्त्यांचा सूर
प्रतिनिधी / फोंडा
बदलत्या युगाचे आणि समाज मनाचे प्रतिबिंब वर्तमानपत्राबरोबरच साहित्यातून उमटत असते. ही दोन्ही माध्यमे परस्पर पुरक असून सशक्त समाज निर्मितीसाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 60 व्या वर्धापनदिन सोहळय़ानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात वक्त्यांनी मांडले. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सहकार्याने नागेशी येथे हा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘लिखित माध्यम’ हा या चर्चासत्राचा विषय होता.
प्रमुख वक्ते म्हणून सकाळ माध्यम समुहाचे संपादक श्रीराम पवार, पुणे येथील पत्रकार श्रीधर लोणी व दै तरुण भारतचे पत्रकार-साहित्यिक राजू भि. नाईक यांचा त्यात सहभाग होता. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे व उपाध्यक्ष रमेश वंसकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीराम पवार म्हणाले, वर्तमानपत्रातील लेखक आणि साहित्यिक यांचा जवळचा संबंध आहे. बहुतांश साहित्यिक हे वर्तमानपत्रातील लेखक आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमे आणि साहित्य यांचा परस्पराशी एक वेगळा संबंध आहे. प्रसारमाध्यम आणि साहित्य हे माणसाच्या अभिरुचीलला वाव देणारे प्रभावी माध्यम ठरते. मुळात बदलणारे समाजभान हे साहित्यातून यायला हवे. त्यातील लिखाण सर्वसमावेशक असावे. पूर्वीच्या काळातील काही साहित्य हे ग्रामीण भागातील शोषणाविरुद्ध होते. आज समाजात शोषण होत असले तरी त्याचे स्वरुप बदलले आहे. त्याचे प्रतिबिंब वर्तमानपत्रे आणि साहित्यातून उमटायला हवे असे सांगून वर्तमानपत्रे आणि साहित्य यांचा समाज सुधारण्यासाठी प्रभावी वापर होऊ शकतो असे त्यांनी नमूद केले.
श्रीधर लोणी म्हणाले वर्तमानपत्र अर्थातच प्रसारमाध्यम हा समाजाचा अविभाज्य घटक बनला आहे. प्रशिक्षणातून पत्रकार घडविता येतात. पण साहित्यिकाला प्रशिक्षित करणे शक्य नाही. कारण त्याचे लेखन हे स्वयंस्फुर्तीने होते. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सशक्त समाजमन घडविण्यासाठी जसा वापर झाला तसाच तो साहित्यातूनही झाला. पण हे विश्व आता विस्तारले असून नवीन तंत्रज्ञानाशी आपण जुळवून घेतले पाहिजे.
राजू भिकारो नाईक म्हणाले, देशाच्या विविध भागात मराठी भाषिक आहेत. महाराष्ट्राने मराठीसाठी जे योगदान दिले त्याला तोड नाही. पण गोव्यातूनही आणि एकंदरीत बृहन्महाराष्ट्रातून मराठीसाठी जे कार्य झाले त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गोव्यातील वर्तमानपत्रांची भुमिका ही जुलमी पोतूगीज राजवटीत पाहायला मिळाली. गो. पु. हेगडे देसाई, ना. भा. नायक यांच्यासह अनेकांनी केलेल्या पत्रकारीता आणि साहित्य प्रसाराचाही महाराष्ट्राच्या मुख्य धारेत आढावा घेतला जायला पाहिजे, असा आग्रह नाईक यांनी धरला. गोव्यातील पुर्वीच्या आणि आताच्याही वर्तमानपत्रांनी सशक्त समाज निर्मितीसाठी आपल्यापरीने योगदान दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. बृहन्महाराष्ट्रातील अन्य प्रदेशांतीलही मराठीसाठीचे योगदान लक्षात घ्यायला हवे याकडे नाही नाईक यांनी लक्ष वेधले.
स्वागत व प्रास्ताविक उषा तांबे यांनी केले. डॉ. अनिता तिळवे यांनी सूत्रसंचालन तर चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले.
दुपारच्या सत्रात ‘दृकश्राव्य’ माध्यमावर चर्चा झाली. त्यात गोमंतकीय रंगकर्मी देविदास आमोणकर तसेच मुंबईतील रविराज गंदे व औरंगाबाद येथील तुषार बोडखे यांचा सहभाग होता. आमोणकर यांनी दृकश्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर ही जगातील क्रांती ठरली असून शाळा विद्यालयात त्याचा वापर होत असल्याचे सांगितले. मनोरंजनाबरोबरच दैनंदिन वापराचे ते साधन असल्याचेही नमूद केले. तुषार बोडखे म्हणाले, उत्तम साहित्याची सुरेख कलाकृती होऊ शकते हे अनेक चित्रपटांनी दाखवून दिले आहे. रविराज गंधे यांनी विविध माध्यमातील विचार हे कलाकृतीतून उत्तमरित्या प्रदर्शित झाल्याचे सांगितले. रेडिओ, दूरचित्रवाणी आणि आता मोबाईलच्या माध्यमातून अभिव्यक्ती प्रदर्शित होत असून बदलत्या युगात नवनवीन साधने येतील असेही नमूद केले. पौर्णिमा देसाई यांनी स्वागत तर रमेश वंसकर यांनी आभार मानले.