सावंतवाडी प्रतिनिधी
भाजपचा उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभा लढवण्याची इच्छा आहे..मात्र, उमेदवारी कोणाला द्यावी याचा अंतिम निर्णय पार्टी आणि पार्लमेंट बोर्ड घेतील त्यामुळे ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल . परंतु ,सावंतवाडी विधानसभेचा उमेदवार व लोकसभेचा उमेदवार कमळ निशाणी वरच मिळाला पाहिजे. अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे. अशी माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
श्री तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते . त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाप्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते. ते म्हणाले, भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून चार वर्षापेक्षा जास्त काळ आपण काम केले. मुळात जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस ,पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सहकार्य वेळोवेळी मिळाले. ज्यांनी आपल्याला ही संधी दिली ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष बावनकुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांचे आभार. मुळात चार वर्षांमध्ये अनेक उपक्रम आपल्या माध्यमातून राबवण्यात आले. सगळ्यांना बरोबर घेऊन विविध कामे करण्याचा प्रयत्न केला . कार्यकाळामध्ये देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे यांना संधी मिळाली तसेच रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले . या दोघांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम केले. जिल्ह्याचे भाजप मुख्यालय म्हणून येथे कामाला सुरुवात झाली तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचे भाजपाचे कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न केले. आठ तालुक्यांपैकी चार ठिकाणी भाजप कार्यालयासाठी स्वतःच्या जागा घेण्यात आल्या. मोदी@9 कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत विविध कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले या सर्वांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभली.
ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी 152 प्लस व लोकसभेसाठी 45 प्लस असा नारा भाजप नेतृत्वाने दिला असून लोकसभेचा उमेदवार व सावंतवाडी मतदार संघाचा विधानसभेचा उमेदवार हा कमळ निशाणी वरच मिळाला पाहिजे अशी मागणी आपण केली आहे. तर आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे परंतु उमेदवारी देण्याचा निर्णय हा सर्वस्वी पार्टीचा व पार्लामेंट्री बोर्डाचा आहे. त्यामुळे वरिष्ठ चा निर्णय घेतील तोच या ठिकाणी मान्य असेल. तर चार वर्षापेक्षा जास्त काळ भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली यातून शत प्रतिशत भाजप करण्याचा प्रयत्न सर्वाच्या माध्यमातून केला. सावंतवाडी मतदारसंघात एकमेव बांद्यासारख्या ठिकाणी भाजपा निवडणूक लढवत असताना आज या ठिकाणी सर्वाधिक जास्त सरपंच भाजपाचे आहेत याचा आपल्याला अभिमान आहे. आता नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या प्रभाकर सावंत यांना पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा. तर मंत्री केसरकर यांनी अलीकडेच परिषदेत आपले आमदारकीचा पुढील वारसदार सांगताना भाजपचे पदाधिकारी युवराज लखम राजे यांचे नाव घेतले. मुळात त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नाव घेणे शोभत नाही कारण त्यांनी आतापर्यंतच्या आपल्या राजकीय वाटचालीमध्ये एकही नेतृत्व तयार केले नाही त्यामुळे आज त्यांच्यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नाव घेण्याची पाळी आली आहे.