लोकायुक्त पोलीसप्रमुख वंटगोडी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
लहान मुलांमध्ये कॅन्सर आढळून आला तर पालक घाबरून जातात. भीतीने त्यांची गाळण उडते. भीती हाच एक मोठा रोग आहे. त्याचा सामना करण्याची शक्ती प्रत्येकाने बाळगण्याची गरज आहे. सुधारित वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे सर्व रोगांवर आज उत्तम उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे सकारात्मक भावनेने उपचार घेतल्यास त्यावर मात करता येणे शक्य आहे, असे उद्गार लोकायुक्त पोलीसप्रमुख यशोदा वंटगोडी यांनी काढले.
आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 15 रोजी केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्र येथे लहान मुलांच्या कॅन्सर विभागाने आयोजित केलेल्या जागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यशोदा वंटगोडी पुढे म्हणाल्या, जीवनात कोणत्याही कारणासाठी घाबरून जाऊ नये. कॅन्सरचे वेळेत निदान झाले, योग्यवेळी त्यावर उपचार मिळाले तर कॅन्सर बरा होऊ शकतो. इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. दयानंद म्हणाले, एखाद्या मुलाला कॅन्सर झाला तर सर्वात जास्त त्रास त्याच्या पालकांना होतो. सर्वाधिक समस्यांना त्यांनाच तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांनीच सकारात्मक भावना ठेवण्याची गरज आहे.