प्रतिनिधी /बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेला 2022 हे वर्ष महसुलाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले. आतापर्यंतचे सर्वोच्च उत्पन्न म्हणजेच 7 हजार 509 कोटी रुपये नैर्त्रुत्य रेल्वेने जमा केले आहेत. यापैकी 2 हजार 534 कोटी रुपयांचा महसूल केवळ प्रवासी वाहतुकीतून नैर्त्रुत्य रेल्वेला मिळाला आहे. जानेवारी ते डिसेंबर महिन्यात नैर्त्रुत्य रेल्वेने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हे यश मिळाले आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या बदलांमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हद्दीतील अनेक रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. धारवाड रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून हुबळी रेल्वेस्थानकाला तिसरे प्रवेशद्वार निर्माण करण्यात आले आहे. बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून या महिन्यात उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत 712 कि. मी. अंतराच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. तसेच 22 कि. मी. नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यात आली. 210 कि. मी. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात आले आहे. सध्या नैर्त्रुत्य रेल्वे विभागात एकूण 75 रेल्वे या विजेवर धावतात. महत्त्वाच्या सन व उत्सवांना 161 विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या. तसेच 91 एक्स्प्रेसच्या वेगामध्ये वाढ करण्यात आल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.
माल वाहतुकीतून सर्वाधिक उत्पन्न
नैर्त्रुत्य रेल्वेने प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच या वाहतुकीमधून विभागाला मोठे उत्पन्न मिळत आहे. धान्य, सिमेंट, खत, कोळसा यासह वाहनांची वाहतूक यामधून रेल्वेचा महसूल वाढत आहे. यावर्षी 45 लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे.