दिवसभर डीजेच्या कर्कश आवाजामुळे बेळगाववासीय वैतागले
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव, शिवजयंती साजरी करताना पोलीस प्रशासन मंडळांवर अनेक नियम व अटी लादत असते. परवानगीसाठी महिनाभर कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागते. मात्र, आता कोणती परवानगी नाही किंवा कोणताही निकष नाही. केवळ कर्कश आवाजाच्या डीजे लावून अक्षरशः कन्नड संघटनांनी बेळगावकरांना वेठीस धरले. या प्रकारामुळे लहान मुले तसेच वृद्धांना त्याचा मोठा त्रास झाला. त्यामुळे आता पोलीस किती डीजेंवर गुन्हा दाखल करणार आहेत? असा प्रश्न बेळगावच्या जनतेतून उपस्थित केला जात आहे.
कर्कश आवाजाच्या डीजेमुळे अक्षरशः सर्वसामान्य जनतेच्या हृदयाचे ठोके वाढले होते. लहान मुलांबरोबर वृद्धांना या आवाजामुळे अत्यवस्थ होण्याची वेळ आली होती. इतका कर्कश आवाज सुरू असताना पोलिसांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली. यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. इतर समारंभांवेळी डीजेवर बंदी घालणारे जिल्हा प्रशासन मूग गिळून गप्प का? असा संतप्त सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
राज्योत्सव मिरवणूक नेमकी कशासाठी काढली? हेच उलगडणे बेळगावकरांना अवघड बनले आहे. राज्योत्सव मिरवणुकीत चित्ररथ देखावे सादर करताना राज्यातील क्रांतिकारी व्यक्तींचा इतिहास सादर करणे गरजेचे होते. राज्यातील समस्या किंवा पर्यटनस्थळांची माहिती देखाव्यांमधून सादर करणे गरजेचे आहे. पण केवळ डीजे लावून धिंगाणा घालण्याव्यतिरिक्त एकाही मंडळाने देखावा सादर केला नाही. यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना केवळ धिंगाणा पाहून परतावे लागले.
या मिरवणुकीत कोणतीच शिस्त नव्हती. केवळ पोलीस संरक्षणात डीजे लावून मिरवणूक काढण्यात येत होती. याकडे स्थानिक कन्नड जनतेने पाठ फिरविली होती.
जिल्हा प्रशासनाची नाचक्की
सर्वच मंडळांनी सर्रास कर्कश आवाजाच्या डीजेचा वापर केला होता. या डीजेसमोर मद्य ढोसून हिडीस प्रकार सुरू होते. यामुळे महिलांनी तेथून काढता पाय घेतला. राज्योत्सवाचे गांभीर्यच गमावलेल्या या मिरवणुकीमुळे जिल्हा प्रशासनाची नाचक्की झाली. कर्कश आवाजांच्या डीजेवर आता कारवाई केली जाणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. गणेशोत्सव किंवा शिवजयंतीवेळी कमी आवाजात डीजे लावले तरी मंडळांवर कारवाई केली गेली. मग आता या कन्नडिगांवर कारवाई होणार का? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.