ओडिशा सरकारच्या खास राज्यातील महिलांसाठी असणाऱ्या ‘मिशन शक्ती’ या गतिमान व कृतिशील योजनेमुळे फार मोठ्या संख्येतील राज्यातील गरजू महिलांमध्ये मोठे व मुलभूत परिवर्तन घडून आले आहे. ‘मिशन शक्ती’ने राज्यातील महिलांना केवळ रोजगार वा स्वयंरोजगारच दिला नसून त्यांच्यामध्ये आर्थिक आत्मविश्वास निर्माण केला आहे. परिणामी कधी स्वत:च्या नोकरी-रोजगाराच्या निमित्ताने शोध घेणाऱ्या याच महिला आपला स्वयंरोजगार वा घरगुती उद्योगांच्या माध्यमातून काही महिलांना रोजगार देणाऱ्या ठरल्या आहेत.
‘मिशन शक्ती’च्या मूळ संकल्पनेत महिला स्वयंसहाय्यता गटांच्या सहभागी सक्रियतेवर विशेष भर देण्यात आला आहे. अशा प्रकारे महिलांच्या स्वत:पासून सुरू होणाऱ्या व परस्पर सहकार्यावर आधारित अशा उपक्रमाला सतत पाठबळ मिळत गेले. अर्थात हे कठीण मात्र अशक्य नसणारे हे काम शक्य झाले ते शासन-प्रशासनाचे सहकार्य व राज्यातील महिलांच्या सातत्यपूर्ण व सक्रिय सहकार्याने. हे सारे घडून आणण्यासाठी ‘मिशन शक्ती’च्या सुरुवातीच्या टप्प्यात गरजू व परिश्रमी महिलांची निवड करून त्यांना नियोजनपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने प्रशिक्षित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. गरजू व परिश्रमी महिलांना मार्गदर्शनाशिवाय आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यात आले.
यासाठी करण्यात आलेल्या राज्यस्तरीय योजनेमध्ये ओडिशात राज्य स्तरावर विशेषत: ग्रामीण व श्रमजिवी महिलांना त्यांचे कौशल्य, कारागिरी व कामगिरी यावर आधारित विविध व्यवसाय व लघू-उद्योग प्रयत्नपूर्वक व स्थानिक स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात आले. याचाच सामुहिक परिणाम म्हणजे कृषी आणि शेतीशी संबंधित विविध रोजगार संधी, कृषी उत्पादनावर प्रक्रिया-विक्री, फलोत्पादन व फळप्रक्रिया, कृषी उत्पादनांची साठवणूक व विक्री स्वयंरोजगार व सामूहिक स्तरावर करण्याचे विशेष प्रशिक्षण राज्यातील महिलांना देण्यात आले. ओडिशा राज्यातील शासन-प्रशासनाचे प्रयत्न आणि प्रतिसाद याला वाढता प्रतिसाद मिळाला. वाढत्या प्रमाण आणि संख्या मिळत गेल्याने त्याचा अभ्यास करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे लक्ष या साऱ्या प्रयत्न आणि त्यातील महिलांचा सहभाग याकडे होतेच. नवीनबाबूंच्या कल्पक पुढाकाराच्या प्रयत्नांचा पुढील टप्पा म्हणजेच महिलांसाठीचा ‘मिशन शक्ती’ हा उपक्रम. यातून महिलांना नवी व वेगळी दिशा मिळत गेली. ‘मिशन शक्ती’ योजनेचा पहिला प्रयत्न आणि टप्प्यात मिळालेल्या परिणामातून राज्यातील महिलांमधील मेहनत आणि जिद्द याच्या जोडीलाच त्यांच्यातील उद्योजक व परिश्रमी वृत्ती दिसून आली. यातून या महिलांच्या उद्योजकतेला वाव मिळत गेला. स्वयंरोजगार व महिलांच्या उद्योजकतेची सध्याची स्थिती व संख्या सांगायची झाल्यास राज्यात सद्यस्थितीत सुमारे 60 लाख महिलांनी आतापर्यंत स्वयंरोजगाराची कास धरली आहे. राज्यातील महिलांच्या लोकसंख्येपैकी सुमारे 15 टक्के महिला आता स्वयंरोजगार सक्षमपणे करीत आहेत. यापैकी अधिकांश महिलांचे कुटुंबिय सुद्धा या योजनेचे लाभान्वित झाले आहेत.
ओडिशाच्या महिला ‘मिशन शक्ती’चे प्रमुख प्रशासनिक वैशिष्ट्यां म्हणजे आर्थिक-सामाजिक संदर्भात महत्त्वाची व जिव्हाळ्याच्या अशा या योजनेत कुठल्याही स्वरुपातील आर्थिक मदतीचे प्रलोभन महिलांना दाखविण्यात आले नाही. अशा योजना क्षणिक लोकप्रिय भासल्या तरी त्या परिणामकारक राहू शकत नाहीत. यावर स्थायी व परिणामकारक उपाययोजना म्हणून ‘मिशन शक्ती’मध्ये महिला कौशल्य-प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला. यामुळे अशा महिलांना प्रथमच व सामूहिक स्वरुपात स्वयंरोजगार व स्थैर्य आणि स्वाभिमानाचा मार्ग सापडला. उद्योजकतेला पूरक व प्रेरक असे वातावरण आज निर्माण झाले. परिणामी या योजनेतील सहभागी महिला व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक पाठबळ व जगण्याचे बळ दोन्ही मिळाले.
‘मिशन शक्ती’ची मूळ सुरुवात 2001 मध्ये झाली. त्यासाठी ओडिशा सरकारने राज्य स्तरावर महिलांसाठीच्या ‘मिशन शक्ती’ संचालनालयाची स्थापना करण्यात आली. संचालनालयाचे काम राज्य महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत सुरू झाले. 2021 मध्ये 2100 कोटीच्या वार्षिक अर्थसंकल्पासह मिशनला अधिक सक्षम बनविण्यात आले. यामुळे महिलांसाठी अधिक ठोस उपक्रम कार्यक्रमांसह नवे प्रयत्न सुरू झाले. याच प्रयत्नांचा एक मुख्य भाग म्हणून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, मध्यम व लघू मंत्रालयाच्या विशेष सहकार्याने महिला स्वयं सहाय्यता गट अधिक सक्रिय झाले. मिळणाऱ्या प्रतिसादानुसार महिला उद्योजकांची त्यांचा उद्योग व प्रक्रिया यानुसार त्यांची पंचायत समिती स्तरावर विकेंद्रित पद्धतीने वर्गवारी करण्यात आली. महिला स्वयं सहाय्यता केंद्रांतर्गत स्वयं रोजगार प्रकल्पात सक्रियपणे सहभागी झालेल्या 50 महिला लघु-उद्योजकांच्या गटाला 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे देण्यात येऊ लागले.
ग्रामीण क्षेत्रात कृषी उत्पादनांवर आपापल्या कुटिरोद्योग अथवा गृहोद्योगात प्रक्रिया करून आपला व्यवसाय प्रस्थापित करतात अशा यशस्वी महिला उद्योजकांनी कृषी प्रक्रियेशी संबंधित लघू-उद्योग सुरू केल्यास अशा महिला स्वयंसहाय्यता व लघू उद्योग गटाला त्यांच्या सामूहिक कृषी उत्पादन कंपनीसाठी 61 लाख रुपये दिले जातात. महिला उद्योजकांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून फार मोठे काम यातून होत आहे. ग्रामीण महिला उद्योजकांच्या या उद्योजकता चळवळीत आर्थिक व्यवहार आणि शिस्त यावर विशेष भर दिला जातो. त्यांच्या प्रशिक्षण सत्रात यावर भर दिला जातो. यातून लाभार्थी महिलांमध्ये आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात विशेष जाणीव निर्माण होते. त्यांच्या कर्ज वा अनुदान फेडीवर सुद्धा याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. उत्तम आर्थिक व्यवहारांमुळे महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्य महिलांना आज 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी स्वरुपात दिले जाते. गेल्या आर्थिक वर्षात यासंदर्भात सुमारे 162 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले होते. चालू आर्थिक वर्षात ही संख्या 200 कोटी रुपये होण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आजमितीस ओडिशाच्या ‘मिशन शक्ती’ योजनेंतर्गत 6,22,000 महिला स्वयं सहाय्यता उद्यमी गट सक्रिय असून त्यापैकी अधिकांश गट व त्याच्या सदस्या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात चोख व दक्ष असल्याचे दिसून येते. महिला स्वयं सहाय्यता गटामुळे आम्हाला आर्थिक मदतीच्या जोडीलाच सहकार्याचा हात व वेळ प्रसंगी भावनिक विश्वासाची साथ दोन्ही मिळते असे देलंग पंचायत समितीच्या महिला स्वयंसहाय्यता गटप्रमुख बसंती साहू आवर्जुन नमूद करतात.
बसंती साहू यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या 10 सदस्यीय महिला स्वयंसहाय्यता गटसदस्यांनी त्यांनी पिकविलेल्या धान्य व इतर कृषी उत्पादनांची विक्री मध्यस्थांना टाळून त्याची कृषी बाजारात थेट विक्री केली. 2002 मध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाला आता मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. सदस्य संख्या 10 वरुन 80 पर्यंत गेली आहे. प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात या महिलांचे मासिक सरासरी उत्पन्न 2500 होते. आज हे मासिक उत्पन्न 6000 ते 12000 झाले आहे. याशिवाय या महिलांनी स्वयं सहाय्यता गटासाठी 20 लाख रुपयांची धान सफाई व प्रक्रिया मशीन खरेदी केली आहे. यामुळे महिलांनी पिकविलेले धान्य साफ करून व वापरायोग्य स्वरुपात थेट बाजारपेठेत पाठविला जातो. यामुळे ग्राहकांची सोय व धान्य उत्पादकांना फायदा होत आहे. असे तांदूळ विशिष्ट प्रकारे पॅक करून सरकारी वितरण योजना व माध्यान्ह भोजन योजनांमध्ये प्रामुख्याने खरेदी केला जातो. यातून महिलांच्या सहाय्यता गटांचा व्याप आणि व्यवसाय वाढीसाठी फायदा होत आहे.
‘मिशन शक्ती’चे एक प्रमुख व महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे ग्रामीण, गरीब व गरजू महिलांना त्यांच्या अडचणीच्या वेळीच नव्हे तर आयुष्याच्या विविध टप्प्यांवर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तोडगा काढून त्यांच्या कैशल्यांवर आधारित उद्योगशीलतेद्वारा त्यांना आत्मनिर्भर बनविणे हे आहे.
दत्तात्रय आंबुलकर