केंद्रीय पथकाकडून स्मार्ट सिटी कामांची पाहणी : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना कागदावरच राहिल्याचा आरोप
बेळगाव : कोट्यावधी ऊपये खर्च करून शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेची पाहणी केंद्रीय स्मार्ट सिटी योजना आणि वस्ती व्यवहार विभागाचे एडीजी राजीव जैन यांनी केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी योजनेचा कशाप्रकारे बोजवारा उडाला आहे याची माहिती अधिकाऱ्यांना करून दिली. त्यामुळे योजनेची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय अधिकारी अवाक् झाले आहेत. कोट्यावधी ऊपये खर्च करून शहरामध्ये स्मार्ट सिटी योजना राबविण्यात आली असली तरी शहर स्मार्ट झालेले नाही. योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून नियमांचे उल्लंघन करून योजना राबविण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना कागदावरच राहिल्याचा आरोप समाजसेवक सुजित मुळगुंद यांनी केला. योजनेसाठी 930 कोटी ऊपये मंजूर करण्यात आले होते. मात्र बहुतांश विकासकामे दर्जाहीन राबविण्यात आली आहेत. अनावश्यकपणे पैसा खर्च करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेचे नियम डावलून विकासकामे राबविण्यात आली आहेत, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.
शहरांमध्ये ठिकठिकाणी राबविण्यात आलेल्या विकासकामांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी गैरकारभार करून राबविण्यात आलेल्या कामांची माहिती नागरिकांनी अधिकारी जैन यांना दिली. बँक ऑफ इंडिया शहापूर ते जुना पीबी रोडपर्यंत विकासकामे राबविताना अनेक नागरिकांवर अन्याय करण्यात आला आहे. गरज नसलेल्या ठिकाणी कोट्यावधी ऊपये खर्च करून पथदीप बसविण्यात आले आहेत रस्त्यांचा विकास करताना जुन्या पाईपलाईन, डेनेज लाईन याची कोणतीच दखल घेण्यात आलेला नाही. सीडीपीनुसार रस्ता असताना त्या ठिकाणी ग्रंथालय उभारण्यात आले आहे. गोवावेस येथे निर्माण केलेला खाऊ कट्टा येथे नियम डावलून बांधकाम करण्यात आले आहे. नाल्यापासून नऊ मीटर अंतरात कोणतेच बांधकाम करायचे नाही, असा नियम असतानाही कोट्यावधी ऊपये खर्च करून खाऊकट्टा उभारण्यात आला आहे. व्हॅक्सिन डेपो इकोसेन्सिटीव्ह परिसर असतानाही त्या ठिकाणी हजारो झाडांची कत्तल करून इमारत उभारण्यात आली आहे. याबाबत स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती समाजसेवक सुजीत मुळगुंद यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. दरम्यान, झालेल्या विकासकामांबद्दल स्थानिक नागरिक असमाधान असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेच्या कामाची पूर्ण पाहणी न करताच अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रदीप एम. जे., सुभाष कांबळे, स्मार्ट सिटीच्या योजना अधिकारी सईदाबानू बळ्ळारी आदी उपस्थित होते.