मणेराजूरी प्रतिनिधी
मणेराजूरीत मारूती मंदिरात झालेल्या बैठकीत आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे – पाटील यांना पाठिंबा देणेत आला तर येथून पुढे साखळी उपोषण व पुढाऱ्यांना गावबंद आदी आंदोलने करणेत येणार आहेत .
मराठा समाजाला शाश्वत आणि टिकणारे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून येत्या काही दिवसात आंदोलनाची दिशा व्यापक करून त्याची तीव्रता वाढवण्यात येणार आहे, असेही सकल मराठा समाजाच्या युवकांच्या वतीने सांगण्यात आले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारने कायद्यात बसणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, असे त्यांनी सरकारला सुचवले आहे. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून सरकार केवळ कागदी घोडे नाचवत वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात मराठा आंदोलनाची ठिणगी पेटली आहे. एकीकडे गांधीगिरी मार्गाने आमरण उपोषण सुरू असताना दुसरीकडे भगतसिंहांच्या मार्गाने आक्रमक आंदोलनही करण्यात येत आहे.राज्यभरातून मनोज जरांगे – पाटील यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. गावागावात लोक आमरण उपोषण करत आहेत. काही ठिकाणी आंदोलनकर्ते आक्रमक होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मणेराजूरी येथील मारूती मंदीरात सकल मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीत जोपर्यंत हक्काचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी मराठा युवकांनी मशाल मोर्चासह अन्य आंदोलनाचीही तयारी करण्यात येत आहे.सरकारने शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने आरक्षण द्यावे. अन्यथा मराठा समाज जर पेटून उठला तर सरकारला सोसणार नाही, असा गर्भित इशारा बैठकीत देण्यात आला बैठकीस सर्व पक्षीय सकल मराठा समाजाचे पदाधकारी ;युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.