जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई केली पण, माती रस्त्यावरच पडल्याने मोठय़ाप्रमाणात गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कणबर्गी रोडवर जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. मात्र या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. तसेच रस्त्यावर पसरलेली माती जमा करण्यात आली नसल्याने कणबर्गी रस्ता अद्यापही वाहतुकीस बंदच आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसह वाहनधारकांना रस्ता कधी खुला करणार अशी विचारणा वाहनधारक करीत आहेत.
जलवाहिन्या घालण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर खोदाई करण्याचे सत्र संपूर्ण शहरात सुरू आहे. टिळकवाडी परिसरात खानापूर रस्त्यावर जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. तसेच उत्तर भागात देखील कणबर्गी रोडवर खोदाई करण्यात आली आहे. 15 दिवसापूर्वी जलवाहिन्या घालण्यासाठी एका बाजूच्या रस्त्यावर खोदण्यात आले होते. या कामासाठी कणबर्गीकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. नंदीनी डेअरी परिसरात जलवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले असून, खोदण्यात आलेल्या चरी बुजविण्यात आल्या आहे. सदर चरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नसल्याने वाहतूक सुरू करण्यात आली नाही.
काम पूर्ण तरीही रस्ता बंदच
जलवाहिन्या घालून झाल्या तरी हा रस्ता बंदच ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर माती पसरली असून, वाहनधारकांना ये-जा करता येणे अशक्मय आहे. रस्त्यावरून दुचाकी किंवा लहान वाहने गेल्यास घसरून पडण्याचा धोका आहे. त्यामुळे रस्त्यावरील चरी व्यवस्थित बुजवून पसरलेली माती खड्डय़ामध्ये जमा करणे आवश्यक आहे. मात्र एल. ऍण्ड टी कंपनीने चरी बुजविण्याकडे कानाडोळा केला आहे. परिणामी याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. सर्व वाहनांची ये-जा एकाच बाजूच्या रस्त्याने सुरू असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रस्ता खुला करण्याच्या दृष्टीने स्वच्छ करून चरी बुजविण्याची आवश्यकता आहे. याबाबत एल. ऍण्ड कंपनीने समस्यांचे निवारण करावे अशी मागणी होत आहे.