अहिल्या परकाळे,कोल्हापूर
दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला की प्रवेशाची लगबग सुरू होते. यामध्ये तंत्रनिकेतन, अकरावी, अभियांत्रिकी, मेडिकल, एमबीबीएस, एमबीए, कृषी महाविद्यालय अशा अनेक अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाईन असतात. राज्य शासन शिक्षण विभागाची वेबसाईट असल्याने कधी शासन पातळीवर तांत्रिक अडचणी येतात तर कधी जास्तीत जास्त विद्यार्थी एकाचवेळी अर्ज भरत असल्याने वेबसाईट हँग होते. यंदाही शासकीय तंत्रनिकेतनची नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांचे गुणच नोंद होत नव्हते. तब्बल आठ दिवसानंतर शासनाने वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर केल्या. गतवर्षी असाच प्रकार कृषी महाविद्यालयासह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशात घडला होता. त्यामुळे ऑनलाईन प्रवेशाचा कायमच बोजवारा उडालेला असतो.
ऑनलाईन प्रवेश असो वा ऑनलाईन परीक्षा वेबसाईट हँगचा विद्यार्थ्यांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा दिलेल्या मुदतीत अर्ज न भरल्याने प्रवेश मिळाला नाही, किंवा ऑनलाईन पेपर अर्धवटच राहिला, अशा घटना घडल्या आहेत. प्रवेशासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला व जात प्रमाणपत्राचा गोंधळ कायमचाच असतो. कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशावेळीच शासनाने प्रवेश कालावधीमध्ये वेबसाईटवरील अडथळे दूर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहिजे, अशीच अपेक्षा विद्यार्थी व पालकांची असते. परंतु शासन याकडे लक्ष कधी देणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पारंपरिकसह व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. आपल्याला पहिल्यांदा प्रवेश मिळावा यासाठी सर्वजण एकाचवेळी अर्ज भरीत असतात. त्यामुळे वेबसाईट हँग होतेच. पण अनेकदा वेबसाईट तयार करतानाच एखादा ऑप्शन चुकलेला असला की प्रवेश किंवा परीक्षा अर्ज भरताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. एवढे करूनही प्रवेश मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे सर्वच विषयांच्या ऑनलाईन प्रवेशाच्या वेबसाईटवरील अर्ज विद्यार्थ्यांना सहजा, सहजी भरता यावेत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.
प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर
प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी आपल्या महाविद्यालयाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी इंजिनिअरिंग, फार्मसी, तंत्रनिकेतन, मेडीकल अशा अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्थांनी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिरात प्रवेशाची प्रक्रिया व पारंपारिकसह सर्वच व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी शिबिरांना विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रवेश प्रक्रियेचा कालावधी वाढवावा
शासनाकडून दिलेल्या कालावधीमध्ये अर्ज भरण्यासाठी एकाचवेळी लाखो विद्यार्थी अर्ज भरतात. एकाचवेळी वेबसाईटच्या युजरची संख्या वाढल्याने वेबसाईट हँग होते. त्यामुळे युजरची क्षमता वाढवून, प्रवेश प्रक्रियेचा कालावधी वाढवावा. तसेच विद्यार्थी व पालकांनीसुध्दा एकाच दिवशी लॉगईन न करता, रात्री व सकाळच्या वेळेत अर्ज भरला तर वेबसाईट हँग होणार नाही.
प्रा. महादेव कागवाडे (रसायनशास्त्र अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन)
दोन दिवस नेट बंद असल्याचा विद्यार्थ्यांना फटका
कोल्हापूर बंदनंतर शासनाच्या परवानगीने जवळपास दोन दिवस जिल्ह्यातील नेट सिस्टिम बंद असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शासन वेळ वाढवून देणार का? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित होत आहे.