पर्यटनवाढीसाठी विशेष निधी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; अन्य प्रलंबित प्रश्नांकडेही वेधले लक्ष
कोल्हापूर प्रतिनिधी
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा समतेचा संदेश देणारी, विकासात्मक दूरदृष्टीचे दर्शन घडविणाऱ्या या करवीर नगरीला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गडकिल्ले, संस्थानकालीन वाडे, वास्तू असे ऐतिहासिक वैभव कोल्हापुरात आहे. त्यामुळे जयपूरप्रमाणे कोल्हापूरचे हे ऐतिहासिक वैभव देशपातळीवर पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. येथील पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी सरकारने विशेष निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
शासन आपल्या दारी उपक्रमातंर्गत तपोवन मैदान येथे आयोजित कार्यक्रमात राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात योजनेचा लाभ देण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासह प्रलंबित विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, शेंडा पार्क येथील जमिन शासनाच्या ताब्यात आल्यास कोल्हापूरच्या विकासाची दारे खुली होतील. त्यामुळे ही जागा शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात होण्यासाठी तत्काळ मुख्य न्यायाधिशांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी निधीची तरतूद करुन प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात यावी. तसेच करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील शासकीय कार्यालये अन्यत्र स्थलांतरीत केली आहे. या ऐतिहासिक वास्तुंना पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देत येथील जीवनशैली, संस्कृती पर्यटकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी राज्यात यापूर्वी हेलपाटे मारल्याशिवाय शासकीय कामे होत नव्हती. परंतू शिंदे-फडणवीस सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमामुळे प्रशासन गतीमान झाल्याचे सांगितले. खासदार धैर्यशील माने म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे तळगाळातील नागरीकांना उभारी देण्याचे काम हे सरकार करत असल्याचे खासदार माने यांनी सांगितले. खासदार संजय मंडलिक, मुख्यमंत्री खासगी सचिव अमोल शिंदे, कार्य अधिकारी अमित हुक्कीरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आभार मानले.
सहा महिन्यात औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण
कोल्हापुरच्या औद्यागिक वसाहतीस विशेष असे महत्त्व आहे. पण जागा उपलब्ध नसल्याने येथील औद्यागिक वसाहत विस्तारीकरणास मर्यादा येत आहेत. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी, उद्योजक यांच्याकडून औद्यागिक वासाहतीच्या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यानुसार पुढील सहा महिन्यात कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण करुन येथील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागून तरुणांना मोठयाप्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणात 15 टक्के जागा हि लघू उद्योगांसाठी राखीव ठेवणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
योजना जनतेपर्यंत पोहचविणारा उपक्रम
शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या अकरा महिन्यात विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. पण या योजना जनतेपर्यंत पोहचत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून जिल्ह्यातील 1 लाख 58 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
जनतेपर्यंत योजना पोहचविणारे सरकार
यापूर्वी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने या योजना कागदोपत्रीच रहायच्या. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने रात्रंदिवस जनतेसाठी झटणारे नेतृत्त्व राज्याला मिळाले आहे. त्यांच्या संकल्पनेतून आज शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचत आहेत. आमचे सरकार हे कागदोपत्री योजना राबविणारे नसून सर्वसामान्य, कष्टकरी जनतेपर्यंत योजना पोहचविणारे हे सरकार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.