अधिवेशन कालावधी घटविल्याने नाराजी : सातही आमदार एकत्रपणे रणनीती आखणार
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन केवळ चारच दिवस चालविण्याच्या सभापतींच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या विरोधी आमदारांनी या अधिवेशनात सरकारला घेरण्यासंबंधी रणनीती आखण्यासाठी आज 26 डिसेंबर रोजी संयुक्त बैठक घेण्याचे ठरवले आहे. दि. 16 ते 19 जानेवारी दरम्यान अधिवेशन चालणार आहे.
चाळीस सदस्यीय विधानसभेतील तब्बल 33 आमदार भाजपकडे असून उर्वरित चार पक्षांचे मिळून केवळ सात आमदार विरोधात आहेत. त्यात काँग्रेसचे तीन, आपचे दोन तर गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स यांचा प्रत्येकी एक आमदार यांचा समावेश आहे. आज होणाऱया बैठकीत आमदार विजय सरदेसाई, व्हेंझी व्हिएगास, प्रुझ सिल्वा, वीरेश बोरकर, कार्लोस फरेरा आणि अल्टोन डिकॉस्टा उपस्थित राहणार आहेत.
पावसाळीनंतर हिवाळीही आटोपते
याआधी पावसाळी अधिवेशनही अशाच प्रकारे आधी एका महिन्यासाठी चालणार असल्याचे जाहीर करून ऐनवेळी त्यात 10 दिवसांनी कपात करण्यात आली होती. त्यावेळी विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. त्यासंबंधी स्पष्टीकरण देताना सभापतींनी पंचायत निवडणूक जाहीर झाल्यामुळे अधिवेशन कालावधी कमी करण्यात आल्याचे म्हटले होते.
विरोधी आमदारांना त्यांच्या संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुरेशी वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी त्यावेळी करण्यात आल्या होत्या. तसेच किमान हिवाळी अधिवेशन तरी जास्त कालावधीचे असावे, असे मत व्यक्त केले होते. मात्र, हेही अधिवेशन केवळ चार दिवसांवर आल्याने विरोधक नाराज झाले आहेत.
भाजप सरकार भित्रे : आलेमाव
त्यासंबंधी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, भाजप सरकार भित्रे असल्याची टीका केली. या सरकारमध्ये विरोधकांना सामोरे जाण्याची हिंमत नसल्यानेच अधिवेशन अवघ्या चार दिवसांसाठी बोलावले आहे, असे ते म्हणाले. पण आम्ही सात विरोधी आमदार एकत्र आहोत आणि अनेक मुद्यांवर सरकारला घेरणार आहोत, असे आलेमाव म्हणाले.
सरकारमध्ये धमक नाही : सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई यांनीही अधिवेशन कालावधी कमी करण्याच्या निर्णयावर टीका करताना, सरकारमध्ये विरोधकांचा सामना करण्याची धमक नसल्यानेच केवळ नाममात्र कालावधीत अधिवेशन आटोपण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, असे ते म्हणाले.