नवीन वर्ष नवीन आव्हाने घेऊन आले आहे. आव्हानांना कसे सामोरे जायचे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगले माहित आहे. निदान गेल्या आठ-नऊ वर्षात त्यांनी देशाच्या राजकारणात ‘आपण म्हणेल ती पूर्व’ असे एकप्रकारे सिद्ध केल्याने विरोधी पक्षांची डाळच शिजली नाही. गुजरातमधील भाजपच्या जंगी विजयाने विरोधी पक्षांना जणू इशाराच दिलेला आहे की जर का तुम्ही एकत्र येऊन लढला नाहीत तर तुमचे हाल कुत्रे खाणार नाही. पण असे असूनही ‘पी हळद हो गोरी’ अशा प्रकारे विरोधी पक्ष लवकरच एकत्र येतील अशी सूतराम शक्मयता नाही.
येत्या वर्षात जर जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूका घेतल्या गेल्या तर एकूण दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात निवडणूका घेतल्या जातील. कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या चार मोठय़ा राज्यात जे रागरंग बघायला मिळतील त्यावर विरोधी ऐक्मयाचा खुळखुळा कितपत वाजणार हे ठरणार आहे. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने म्हणतात ना तसेच. जयराम रमेश जणू म्हणतात की काँग्रेसला बाजूला ठेवून विरोधी ऐक्मयाच्या बात करणे म्हणजे रामाशिवाय रामायण आणि कृष्णाशिवाय महाभारत. एप्रिलपर्यंत होत असलेली कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक वारे कशा रीतीने वाहत आहेत ते दाखवणार आहे. त्यावरदेखील बरेच काही अवलंबून आहे. बाकी तीन प्रमुख राज्यांच्या निवडणूका या वर्षाच्या शेवटी असल्याने कर्नाटकावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
भाजपने दक्षिणेचे महाद्वार घोषित केलेल्या कर्नाटकात सत्ताधारी पक्ष हिंदुत्वासह बरीच हत्यारे एकाचवेळी वापरत आहे. याचा अर्थ म्हणजे राज्यातील पाणी कितपत खोल आहे, याचा त्याला अंदाज येत नाही, असा होतो. स्थानिक मुद्यांनी जोर पकडला आणि काँग्रेसने आपल्या नेतृत्वात एकी आणली तर हिमाचल सारखा जोरदार सामना तिथे होऊ शकतो. मल्लिकार्जुन खर्गे हे स्वतः कर्नाटकमधील असल्याने त्यांचीदेखील कसोटी लागणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेसला संजीवनी मिळण्याचे काम झालेले असले तरी त्यामुळेच उत्तरप्रदेशातील गैरभाजप पक्षात एक प्रकारची घबराट उडालेली दिसत आहे. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी या यात्रेत सामील न होऊन काँग्रेसला ‘मेरे अंगनेमे तुम्हारा क्मया काम हैं?’ असाच जणू सवाल विचारला आहे. बसपच्या मायावतींची गोष्ट काही वेगळी नाही. अखिलेश यांना आपली मुस्लिम आणि यादव मतपेढी कोणामध्ये वाटावयाची नाही तर मायावतींना बसपच्या दावणीला बांधलेला दलित समाज काँग्रेसकडे परत जाण्याची नेहमी भीतीच वाटली आहे. उत्तर प्रदेशातील दलितांचे पहिले घर तर काँग्रेसचे होते, हे त्या विसरू शकत नाहीत. अरविंद केजरीवाल यांची सतत वेगळी चूल राहिली आहे. एकीकडे भाजपविरोध दाखवायचा आणि दुसरीकडे काँग्रेसला खच्ची करण्याचे राजकारण आम आदमी पक्षाने केलेले आहे. येत्या वर्षातील विधानसभा निवडणूकात एकीकडे केजरीवाल यांचा पक्ष तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष भाजपला मदत करणार अशी भीती विरोधी वर्तुळात आहे. ही भीती निराधार आहे असे म्हणता येणार नाही.
समाजवादी पक्ष आणि बसपने वाऱयावर सोडूनदेखील भारत जोडो यात्रेला उत्तरप्रदेशात देखील जोरदार प्रतिसाद मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये हुरूप वाढला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या पुजाऱयाने राहुल यांची केलेली भलावण ही काँग्रेसीना हुरळून गेली नसती तरच नवल होते. गेल्या वषीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ 2.3 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे जोपर्यंत उत्तरप्रदेशात पक्षाचे सितारे बुलंद होत नाहीत तोवर राष्ट्रीय राजकारणात पुढे जायचा मार्ग काँग्रेसला सापडणार नाही. राहुल यांच्या यात्रेने काँग्रेसची पत वाढत आहे आणि त्यांची प्रतिमादेखील सुधारत आहे. ‘आईची माया न पोर जाई वाया’ अशी अटकळ मनाशी बांधल्याने सोनियांचे लाडावलेले सुपुत्र राजकारणात फार दिवे लावू शकणार नाहीत असा काँग्रेस विरोधकांचा तसेच जुन्याजाणत्या काँग्रेसींचा समज झाला होता. आता कडाक्मयाच्या थंडीतील ‘टी शर्ट’ वाले राहुल बघून ही मंडळी चाट पडली आहेत. भाजपमधील असंतुष्ट नेते आणि संजय गांधी यांचे पुत्र वरुण गांधी काँग्रेसच्या वाटेवर आहेत असे स्पष्ट संकेत आहेत.
विरोधी पक्ष विखुरलेले राहिले असले तरी विखुरलेले गांधी-नेहरू घराणे एकत्र होणार असे दिसत आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्मयाच्या प्रश्नाला बरेच पदर आहेत. ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, जगनमोहन रेड्डी हे प्रादेशिक पक्षांचे नेते एकीकडे काँग्रेसला पाण्यात पाहत आहेत तर दुसरीकडे नितीश कुमार आणि एम के स्टालिन हे काँग्रेसबरोबर आहेत. तेजस्वी यादव यांचा पक्ष तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसबरोबर राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काँग्रेसच्या मित्रपक्षांना काँग्रेस म्हणजे भरपूर दूध देणारी पण कमी खाणारी अशी गाय हवी. याचा अर्थ काँग्रेसच्या जीवावर त्यांना सत्ता तर मिळवायची आहे व त्याचबरोबर त्यांना सत्तेत देखील झुकते माप हवे आहे. राजकारणात असे होत नसते. काँग्रेस फारसे काही बोलत नसली तरी तिला सत्तेत सिंहाचा वाटा पाहिजे हे जाणकारांना कळते आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यापासून मित्र पक्ष केवळ शोभेपुरते असल्याने भाजपला साथीदार मिळत नाही आहेत. जे बरोबर आहेत ते मजबूरीने. महाराष्ट्रात शिंदे गटाचे जे हाल सुरु आहेत ते दररोज दिसतच आहेत. चिराग पासवान यांच्यासारखा एखादाच प्रादेशिक नेता भाजपकडे चालला आहे असे दिसत आहे. बिहारच्या गजबजलेल्या राजकारणात केवळ भाजपबरोबर राहिले तरच चिराग यांना भविष्य आहे. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पूर्णवेळ राजकारण करणारे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीची पद्धतशीर तयारी त्यांनी सुरु केली आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या दिवशी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उदघाटन होणार आहे असे जाहीर करून गृहमंत्र्यांनी हिंदुत्वाचा ज्वर वाढणार असेच सूचित केलेले आहे. भाजपकरता बारामतीसह देशातील 160 मतदारसंघ दुबळे आहेत. त्यांच्यावर विशेष ध्यान देण्याचे काम पेंव्हाच सुरु झाले आहे. विरोधी पक्षांना विखुरलेले ठेवण्यासाठी तसेच विरोधी पक्षांची सरकारे उलथवण्यासाठी भाजप पहिल्यापासून खास मेहनत घेत आहे. निवडणुकीतील साधने बघितली तर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणजे ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शाम भटाची तट्टाणी’ असा प्रकार आहे.
अशामुळे विरोधी पक्षांची ऐक्मय प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर सुरु होणार. याचा अर्थ विरोधी नेत्यांमध्ये अनौपचारिक बोलणी सुरु झालेली नाहीत असा नव्हे. ईडी आणि सीबीआयचा बागुलबुवा असल्याने सारे काम सध्या अजिबात गाजावाजा न करता होत आहे. शेवटी विरोधी ऐक्मय म्हणजे गाजराची पुंगी ठरणार की राष्ट्रीय स्तरावर एखादी महा आघाडी बनणार ते येत्या वर्षात राजकारण कसे वळण घेणार त्यावर ठरणार आहे. काँग्रेस काडी पहिलवान राहिली तर कोणी तिच्या सावलीला देखील उभे राहणार नाही. याउलट भाजपला धक्के बसले तर ‘एक धक्का और दो’ अशा आरोळय़ा विरोधी गोटात सुरु होतील. गैरभाजप आणि गैरकाँग्रेस पक्षांकरता भाजप आणि काँग्रेस हे ‘सापनाथ’ आणि ‘नागनाथ’ च आहेत. त्यामुळे कोणाकडून जास्त फायदा त्याकडे ही मंडळी शेवटी वळणार आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या सर्वाना घेऊन जाणाऱया नेत्यालादेखील या मंडळींनी 2004 साली ठेंगा दाखवला होता, हा ताजा इतिहास आहे.
सुनील गाताडे