रोपांना पाणी घालण्याकडे दुर्लक्ष, नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. याअंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करून फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. तसेच कुंड्यांमध्ये शोभेची झाडे लावून फुटपाथवर ठेवण्यात आले आहेत. मात्र सदर रोपांना पाणी घालण्याकडे दुर्लक्ष केल्याने सदर कुंड्यांमधील सर्व शोभेची झाडे सुकली आहेत.
शहर स्मार्ट बनविण्यासाठी एक हजार कोटीच्या निधीचा चुराडा करण्यात आला आहे. याअंतर्गत प्रमुख रस्त्याचे काँक्रीटीकरण, फुटपाथ, दुभाजक आणि पथदिपांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच रस्त्याचे सुशोभिकरण करण्यासाठी फुटपाथवर कुंड्या ठेवून शोभेची झाडे लावण्यात आली होती. पण झाडांची देखभाल करण्याकडे स्मार्टसिटी आणि महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शिवबसवनगर परिसरातील झाडांची रोपे चोरून नेण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. माळमाऊती, महांतेशनगर आणि विविध ठिकाणी असलेल्या कुंड्यांमधील रोपे पूर्णपणे सुकली आहेत.
रोपे लावण्यात आली, पण पाणी घालण्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी असलेली रोपे चोरून नेण्यात आल्याने कुंड्या रिकामी झाल्या आहेत. त्यामुळे शोभेच्या झाडाऐवजी आता कुंड्या शोभेच्या बनल्या आहेत. कोट्यावधी निधी खर्चून शहर स्मार्ट बनविण्यासाठी आटापिटा करण्यात आला आहे. पण देखभालीअभावी स्मार्टपण हरवत चालले आहे. स्मार्टसिटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.