सावंतवाडी प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्या समोर आज रोजी जबाब दो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून बहुसंख्य मराठ्यांनी सहभाग नोंदविला होता. या आंदोलनामध्ये मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट सुहास सावंत यांनी समाजाला संबोधताना सांगितले की महाराष्ट्र सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ लागू होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची शांततामय मार्गाने चाललेली चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयाने 50% ची मर्यादा ओलांडत आहे या कारणासाठी नाकारला होता. आज मराठा समाजाला कायदेशीररित्या आरक्षण द्यावयाचे झाल्यास 50% मर्यादेत देता येऊ शकते. परंतु याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्यामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. व महाराष्ट्र शासनाला ओबीसींची निश्चित लोकसंख्या किती याची निश्चिती करून ओबीसींना आरक्षण द्यावे या याकरिता महाराष्ट्र सरकारने भाटिया आयोग नेमलेला होता. या अनुसार आयोगानुसार महाराष्ट्रामध्ये 37% ओबीसींची लोकसंख्या आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आज 32% आरक्षण मिळत आहे .
नियमाप्रमाणे फक्त 18 टक्के आरक्षण मिळू शकते, सरकार पुढे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्याचे धर्मसंकट उभे आहे. अन्यथा मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे लागेल. ओबीसी नेत्यांच्या दबावाखाली येऊन मराठा चळवळ मोडीत काढण्यासाठी जालना येथील प्रसंग सरकारने घडवून आणला. मराठा समाज आपल्या मुद्याला कोणत्याही राजकीय लोकांच्या कच्छपी न लागता ठाम राहिल्यास मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळण्याचा दिवस दूर नाहीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज निष्पाप मराठा बांधव अट्रोसिटीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्याच प्रमाणे सारथी योजना अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून केली जात नाही, त्याचप्रमाणे बिंदूनमावलीचा घोटाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेला आहे, या घोटाळ्याची तड लावल्यास मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाचे आरक्षण मिळू शकते. जिल्हा प्रशासनाने गणपती उत्सवापर्यंत मराठा समाजाला भेडसावणारे व मराठा बेरोजगारांच्या मुळावर उठणारे प्रश्न सोडवले नाही तर मराठा समाज गणपती उत्सवानंतर जिल्ह्यात आक्रमक आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक,काँग्रेस नेते विकास सावंत, जान्हवी सावंत, अमरसेंन सावंत, आनंद भोगले, संग्राम सावंत, वैभव जाधव, शैलेश घोगळे, धीरज परब, हर्षद पालव, सतीश बागवे,अविनाश सावंत,साईदीप दळवी, ऍड सोनू गवस, उदय पास्ते,मिलिंद परब, शुभम राणे, वगैरे मराठा बांधव उपस्थित होते आमदार वैभव नाईक विकास सावंत आदींनी आपले विचार मांडले