ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोकणात बारसू-सोलगाव येथे रिफायनरी प्रस्तावित आहे. या रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे. मात्र, या रिफायनरीला विरोध करत स्थानिकांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, घटनास्थळी पोलिसांकडून बळाचा वापर होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकारावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.
रिफायनरीचा सर्व्हे थांबवा, लोकांशी आपण चर्चा करू, एकत्र बसून लोकांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे नाहीतर प्रोजेक्ट अडचणीत येईल, असे पवारांनी सामंत यांना सांगितले. यावर सामंत यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून कळवतो, असे अश्वासन त्यांना दिले. दरम्यान, याच प्रश्नावर उद्या (दि.26) सांमत सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवारांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, या आंदोलनात ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना सोडून द्या असेही पवारांनी सांमत यांना सांगितले आहे. या रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 25 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.