सांगरुळ, वार्ताहर
Kolhapur News: ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध काम करत दीड कोटी खर्चाच्या पेयजल योजनेचे काम एका वर्षात चांगल्या प्रकारे पूर्ण करून गावाला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे एक चांगले काम केले आहे.भविष्यात विकास कामासाठी आमशी गावाला निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांनी दिली. आमशी (ता . करवीर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पेयजल योजना उद्घाटन समारंभात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. जयंत आसगावकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पी. एन. पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला निधी दिला असून, भविष्यातही विकास कामाच्या बाबतीत मतदार संघातील एकही गाव,वाडी-वस्ती वंचित राहणार नाही याची ग्वाही दिली.प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणारे तिसऱ्या यादीतील शेतकरी अद्यापही शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत त्यांनाही हे पैसे मिळवून देण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवू अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना जयंत आसगावकर म्हणाले की, आमदार फंडातून पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील शाळांना टू- इन-वन प्रिंटर वाटपाचे काम सुरू असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सत्तेच्या काळात मंत्री महोदयांच्याकडून मिळणाऱ्या फंडातून सांगरुळ शिक्षण संस्थेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावाला निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.भविष्यातही अशा प्रकारचा निधी परिसरातील गावाला देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील, बाळासाहेब खाडे, निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी, डी. एस. पाटील, कुंभी बँकेचे माजी संचालक दिनकर पाटील यांनी ग्रामपंचायतीने दीड कोटीची पेजल योजना एक वर्षात चांगल्या प्रकारे पूर्ण केल्याबद्दल ग्रामपंचायतीची व ठेकेदारांचे कौतुक केले.
प्रास्ताविक करताना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा घेत उर्वरित अपूर्ण कामासाठी निधी देण्याची मागणी केली.यानंतर राष्ट्रीय पेयजल योजनेचे व जयंत आसगावकर यांच्या फंडातील रस्त्याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीराम सहकार समूहाचे अध्यक्ष आर. टी. पाटील, सरपंच पल्लवी पाटील, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, नामदेव पाटील, रामनाथ पाटील, जयदीप पाटील, सरदार सावंत, शिवाजी पाटील, बाजीराव कांबळे, उज्वला पाटील, आरती सावंत, सविता पाटील, तेजस्विनी पाटील, रेश्मा लोखंडे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर व अशोक कांबळे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.