आशिया चषक स्पर्धा तटस्थ ठिकाणी घेण्याच्या हालचाली, ‘पीसीबी’ अस्वस्थ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई क्रिकेट मंडळाने (एसीसी) यंदा होणार असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या आशिया चषक स्पर्धेसाठी तटस्थ ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने यंदाच्या उत्तरार्धात भारतात होणार असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ‘एसीसी’ने आशिया चषकासाठीचे नवे स्थळ मार्चमध्ये ठरविण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट मंडळ आशिया चषक स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलविण्याच्या विचारावर खूष नाही. सदर ठिकाणांच्या यादीत संयुक्त अरब अमिरातीचे नाव शीर्षस्थानी असून त्यांना यजमानपद मिळू शकते. परंतु तसे झाल्यास पाकिस्तान भारतातील विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी जाणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
सुरक्षेच्या कारणास्तव आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार नाही आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवली जाईल, असे एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी आधीच स्पष्ट केलेले आहे. नवीन ठिकाण मार्च महिन्यात एसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या फेरीत ठरविण्यात येईल.
गेल्या वषी आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्या राष्ट्राला पुन्हा यजमानपद मिळण्याची दाट शक्मयता आहे. भारत-पाकिस्तानमधील राजकीय तणावादरम्यान कतारनेही सदर स्पर्धा तटस्थ स्थळ म्हणून आयोजित करण्यात स्वारस्य दाखवले आहे. कतारने याआधी काही क्रिकेट स्पर्धा आणि क्रिकेट लीगचे आयोजन केलेले आहे.