नवीन पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताशी शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याची आणि भारतासह काम करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. काश्मीरसह सर्व विवाद्य मुद्दय़ांवर भारताशी संवाद साधून तोडगा काढण्यावर आमचा भर असेल, अशा आशयाचे पत्र पाकिस्तानचे नूतन पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले आहे.
शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना अभिनंदनाचा संदेश पाठविला होता. त्याच्या उत्तरार्थ त्यांनी हे पत्र पाठविल्याचे स्पष्ट करण्यात आले. दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अनेक मुद्दय़ांचा समावेश होतो. यात काश्मीरचा मुद्दाही समाविष्ट आहे. चर्चेच्या द्वारे तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारताशी आम्हाला चांगले संबंध हवे आहेत. पाकिस्तानने दहशतवादाशी लढताना फार मोठे बलिदान दिले आहे अशी पुस्तीही त्यांनी या पत्रात जोडली आहे.