प्लास्टिकच्या बाटल्यांचे युग लवकरच संपुष्टात येणार असा संकेत मिळत आहे. त्यांच्या स्थानी 100 टक्के कागदापासून निर्माण केलेल्या बाटल्या येणार आहेत. दिल्लीतील एक उद्योजिका समिक्षा गनेरीवाल यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांनी 2018 मध्ये ‘कागजी बॉटल्स’ नामक एक स्टार्टअप स्थापन केले आहे. ही देशातील पहिली स्टार्टअप आहे जी 100 टक्के बायोडिग्रेडेबल (निसर्गात विरुन जाणाऱया) कागदापासून बाटल्या तयार करत आहेत. या बाटल्यांना चांगली मागणीही असून भविष्यात हा उद्योग भरभराटीला येण्याची चिन्हे आहेत.
प्लास्टिकने आपल्या जीवनाचा मोठा भाग व्यापला आहे. सकाळी उठल्यानंतर दात घासण्याच्या ब्रशपासून रात्री झोपेपर्यंत अनेक प्लास्टिकच्या वस्तूंचा अपरिहार्यपणे उपयोग करत असतो. प्लास्टिक हा सेंद्रीय पदार्थ नसल्याने त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱयाचे ढीग जसेच्या तसे पडून राहतात. हा पर्यावरणाला फार मोठा धोका असून त्याला सध्या उत्तर नाही.
गनेरीवाल यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. कागदाच्या बाटल्या बनविण्याची कल्पना त्यांच्या मनात नॅनो पार्टिकल्सच्या संकल्पनेतून आलेली आहे. त्यांनी गेली आठ वर्षे प्रयत्न करून कागदापासून बाटल्या बनविण्याचे शास्त्र विकसित केले आहे. ही बाटली टिकाऊ असून त्यात दूध किंवा पाणी किंवा कोणताही सौम्य द्रवपदार्थ (आम्ल किंवा तीव्र द्रव सोडून) 20 ते 25 दिवस टिकून राहतो. त्यामुळे अशा बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्यांना समर्थ पर्याय ठरू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. नॅनो पार्टिकल्स या रसायनाच्या साहाय्याने कागदातून पाणी किंवा द्रवपदार्थ गळणार नाही, अशी व्यवस्था करता येते. या बाटल्यांसाठी लागणारा कागद 100 टक्के विघटनक्षम असल्याने पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचत नाही. साहजिकच या बाटल्यांमध्ये पर्यावरणस्नेही भविष्यकाळ दडलेला आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. सध्या या बाटल्यांची किमत प्लास्टिक बाटल्यांपेक्षा जास्त असली तरी भविष्यकाळात ती प्लास्टिक बाटल्यांपेक्षाही कमी होऊ शकते. या बाटल्यांना जसजशी मागणी वाढत जाईल आणि प्रारंभीक गुंतवणूक जसजशी भरून येत जाईल तशी या बाटल्यांची किंमतही कमी होण्याची पूर्ण शक्यता आहे.