माध्यान्ह आहार निकृष्ट दर्जाचा, एका शिक्षिकेची अरेरावी, सत्तरी भागशिक्षणाधकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /वाळपई
होंडा नारायणनगर येथील सरकारी माध्यमिक शाळेत पुरविण्यात येणारा माध्यान्ह आहार निकृष्ट स्वरूपाचा आहे. यामुळे मुलांना त्याचा कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे सरकारने नवीन माध्यान्ह आहार कंत्राटदाराची, तसेच कर्तबगार शिक्षकांची या शाळेमध्ये नियुक्ती करावी अशी मागणी पालकांनी केलेली आहे. यासंबंधी आयोजित बैठकीत पालक आक्रमक होत सत्तरी भाग शिक्षणधिकाऱयांना एक निवेदन सादर केले आहे.
दरम्यान सादर केलेल्या निवेदनात पालकांनी या ठिकाणी शिक्षकांची केलेली नियुक्ती पूर्णपणे शैक्षणिक नुकसान करणारी आहे. एका शिक्षिकेची सोय व्हावी यासाठी सदर शिक्षकेची होंडा नारायणनगर विद्यालयामध्ये भरती केल्याचा पालकांचा आरोप आहे. सदर शिक्षकेला गणित विषय शिकविता येत नाही. चुकीच्या पद्धतीने विषय शिकविला जात आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांनी व्यक्त केलेली आहे.
मुलांना शिक्षिकेची भीती
दरम्यान या संदर्भात सादर केलेल्या निवेदनामध्ये विद्यालयामध्ये जाण्यासाठी मुले घाबरत आहेत. क्षुल्लक कारणावरून सदर शिक्षिका मुलांवर ओरडते. यामुळे मुले भीतीच्या छायेखाली वर्गामध्ये बसतात. शिक्षिकेच्या अशा वागण्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
सध्या या प्राथमिक शाळेमध्ये 80 पेक्षा जास्त मुले असल्यामुळे चार कायमस्वरूपी शिक्षकांची नितांत गरज असून त्याची पूर्तता शिक्षण खात्याने करावी, तसेच शाळेत आधीच शिकवत असलेल्या तीन शिक्षकांना शैक्षणिक वर्ष सुरू असताना बदलीवर पाठवू नये, माध्यान्ह आहार पुरविण्यासाठी सक्रिय समाजसेवी संस्थांची नियुक्ती करावी, मुलांना शाळेत पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाक या समस्या सोडविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे.