विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची पत्रकार बैठकीत स्पष्ट भूमिका
वाकरे, प्रतिनिधी
Ujjwal Nikam Visit in Kolhapur : कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला उच्च न्यायालयातील खटल्यांसाठी मुंबईला येणे जिकिरीचे असून कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे ही काळाची गरज असल्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. यावेळी निकम यांनी पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या सत्काराला उपस्थित राहिले याबद्दल चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना अँड. निकम म्हणाले, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी सरन्यायाधीशांना भेटणे हा प्रोटोकॉल आहे. याबाबत वेगळा अर्थ काढणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्यातील सत्ता प्रकरणाबाबत येत्या २७ तारखेला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर ही याचिका येणार असून पाच न्यायाधीशांचे घटनापीठ याबाबत सुनावणी घेणार आहे. यामध्ये अनेक मुद्दे उपस्थित होतील. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल भविष्यकाळात महत्त्वाचा ठरणार आहे असेही ते म्हणाले.
केंद्र शासनाने कृषी कायदा रद्द केला याबाबत बोलताना प्रत्येक कायदा वाईट असतो असे नाही, तो कायदा अभ्यासून त्यातील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना या कायद्याचा फायदा करून देण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.यावेळी व्हिजन चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजीबाबा घोरपडे उपस्थित होते