बंदोबस्त करण्याची महानगरपालिकेकडे नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
खासबाग परिसरात मागील काही दिवसांपासून डुकरांचा उपद्रव वाढला आहे. डुकरांची मोठी पिल्लावळ तयार झाली असून, येथील रहिवासी व व्यापाऱयांना या डुकरांचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्वत्र खराब वातावरण तयार होत असल्याने महानगरपालिकेने या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
प्रत्येक रविवारी खासबाग परिसरात आठवडी बाजार भरतो. शिल्लक राहिलेला भाजीपाला व इतर साहित्य खासबाग येथील बसवेश्वर सर्कल परिसरात टाकले जाते. हा कचरा खाण्यासाठी डुकरांची धावपळ सुरू असते. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक व वाहनचालक यांच्या समोरूनच डुकरांची धावपळ सुरू असते. बऱयाचवेळा या डुकरांमुळे किरकोळ अपघातही घडत आहेत.
या डुकरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा परिणाम परिसरातील व्यवसायांवर होत आहे. डुकरांमुळे गलिच्छपणा वाढला असल्याने नागरिकही परिसरात येण्यास कंटाळत आहेत. त्यामुळे व्यापार कसा करायचा असा प्रश्न दुकानदारांसमोर पडला आहे.
मनपाचे दुर्लक्ष
डुकरांचा उपद्रव सुरू असला तरी महानगरपालिकेचे मात्र या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक रहिवासी मेटाकुटीला आले असून, या भटक्मया डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.