२०२४ ला इंडिया आघाडी विजयी करा आणि केंद्रातले मोदी सरकार व महाराष्ट्रातील अनाजीपंतांचे सरकार हद्दपार करण्याचे आवाहन. होऊ द्या चर्चा अभियानातून उचगावच्या ग्रामस्थांशी साधला संवाद.
उचगाव/वार्ताहर
देश सरंजामशाही, हुकुमशाहीकडे झुकला असुन लोकशाहीचे चारही खांब मोदी सरकारच्या दबावाखाली आहेत अशी बोचरी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली. २०२४ ला इंडिया आघाडी विजयी करा आणि केंद्रातले मोदी सरकार व महाराष्ट्रातील अनाजीपंतांचे सरकार हद्दपार करा असे आवाहनही आमदार जाधव यांनी यावेळी केले.
शिवसेनेच्या “उद्धव ठाकरे गट होऊ द्या चर्चा” उपक्रमांतर्गत आमदार जाधव यांनी उचगाव तालुका करवीर येथे मंगेश वर मंदिर चौकात ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते अरुण दुधवडकर, पुणे शहर समन्वयक महिला आघाडी प्रमुख विद्याताई होडे प्रमुख उपस्थित होते.
आमदार भास्कर जाधव म्हणाले, “केंद्र व राज्य सरकारने पोकळ आश्वासने व मोठमोठ्या घोषणा आणि नवीन योजनांच्या नावाखाली सामान्य माणसाची पुरती दिशाभूल केली आहे. जनतेचे रोजचे जगणे मुश्कील झालेले आहे. प्रशासकीय अधिकारी, न्यायव्यवस्था, पत्रकारिता व लोकप्रतिनिधी ही लोकशाहीचे चारही स्तंभ दबावाखाली असून त्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे जाधव म्हणाले. मणिपूर सारख्या दुर्दैवी घटनांवर संसदेत अविश्वास ठराव आणूनही देशाचे पंतप्रधान फक्त अडीच मिनिटे बोलतात. महिलांच्या अत्याचारावर ते बोलायला तयार नाहीत. नवीन संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती यांच्याकडून करणे ऐवजी पंतप्रधानांनी केले. महिला विधेयक मंजूर झाले असले तरी या निवडणुकीत त्याचा काहीही फायदा होणार नाही.”
“महाराष्ट्राच्या सरकार मध्ये ताळमेळ नाही. नांदेड, संभाजीनगर, ठाणे मध्ये हॉस्पिटलमध्ये कर्मचारी ,अधिकारी नसल्यामुळे माणसे मरत आहेत यासारखे दुर्दैव नाही. कोविडमध्ये उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राची काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही. भारतीय जनता पार्टीकडे पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी ही एकच पर्याय आहेत तर इंडिया आघाडीकडे बहुपर्यायी नेतृत्व आहे.”
आमदार जाधव यांनी मोदींनी आश्वाशित केल्याप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख आले का? घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले का? मोदींनी मोठे मोठे कार्यक्रम करून जाहीर केलेल्या योजना खरोखर सामान्य जनतेमध्ये पोहोचल्या का? महागाई आटोक्यात आली का? सिलेंडरच्या दरात वाढ झाली की नाही अशा अनेक प्रश्नांचा उहापोह केला. म्हणून निवडणुकीचा जुमला म्हणणाऱ्या मोदी सरकारला हद्दपार करा असे आवाहन केले.
हवेतल्या घोषणांनी भावनिक राजकारण करून फेकू सरकार सत्तेवर आले. वाढती महागाई, बेरोजगारी महिला सुरक्षित पाहिजे असतील, गरजूंना एक हजार मिळणारी पेन्शन जर ५००० करायचे असेल तर महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच भगवा फडकवा ,महआवइकआस आघाडी विजयी करा असे आवाहन करून होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून सरकारला जनतेच्या साक्षीने जाब विचारण्यासाठीच आपण इथे उपस्थित असल्याची भावना पुणे शहर समन्वयक महिला आघाडी प्रमुख विद्याताई होडे यांनी मांडली.
आमदार भास्कर जाधव यांनी सरकारचे काढले चिमटे
केंद्र सरकारने महिला विधेयक पास केले असले तरी येत्या निवडणुकीत त्याचा महिलांना उपयोग होणार नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे, संविधानामुळे सर्व सामान्य महिला मालुताई गणेश काळे या उचगाव मध्ये पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच झाल्या.तसेच रिक्षावाले यांनाही बसलेल्या पॅसेंजरना सरकार नको असे प्रबोधन करण्यास सांगितले आहे.
यावेळी संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर जिल्हाप्रमुख संजय पवार,सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांची भाषणे झाली.सुत्रसंचालन व आभार दिपक रेडेकर यांनी मानले. याप्रसंगी शहरप्रमुख सुनील मोदी, समन्वयक हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे,मंजीत माने ,मंगेश साळवी,विक्रम चौगुले, विराज पाटील, विनोद खोत, उचगाव सरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच मालुताई काळे,मिना मांडरे, विराग करी यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.