रत्नागिरीत उपोषण
कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानरांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. वानरांचा बंदोबस्त होऊन भयमुक्त शेती करता यावी या मागणीकरिता रत्नागिरीतील शेतकरी अविनाश काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे.या उपोषणाला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला असून अनेक शेतकऱ्यांनीही उपोषण सुरु केले आहे.
यावेळी बोलताना शेतकरी अविनाश काळ म्हणाले, “आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयात वानरांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेतकरी, बागायतदार आणि नागरिक मेटाकुटीला आले आहेत. ग्रामीण भागात जवळपास प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, कलमे, काजु, भात शेती, नाचणी, कडधान्ये, भाजीपाला, फणस, चिकू, पेरू, अननस, केळी इत्यादी आहे. मात्र आता वानरांचा त्रास या सर्वच पिकांना प्रचंड नुकसान देत आहे. घरावरील नळे तोडणे, घरात शिरून नासधूस करणे, माणसांच्या अंगावर येणे हे प्रकार प्रचंड वाढले आहेत.”असेही त्यांनी आपले मत व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “गेल्या साधारणपणे पस्तीस वर्षांपासून वानरांचा बंदोबस्त न केल्यामुळे त्यांची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आज ह्या जीवघेण्य़ा समस्या निर्माण झाल्या आहेत. वानरांच्या उपद्रवामुळे शेती तसेच बागायती पीके घेणे लोक सोडून देत आहेत. प्रचंड कष्ट करून आणि पैसे खर्च करून पदरात काहीच पडणार नसेल तर बागायती आणि शेती करायची कशाला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.