सावंतवाडी/वार्ताहर:-
सिंधुदुर्गात वाढत्या चोऱ्या, अपघात प्रकरणांमुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून सुरक्षिततेचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून सध्या पोलिसांचे पथक गावात आणि शहरात दिवसारात्री गस्त घालत आहे. वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनखाली वेंगुर्ला पोलिस हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आंतरराज्य महामार्गावर नाकाबंदी करून सर्व वाहनांची तपासणी शनिवारी करण्यात आली. गैरमार्गाचा वापर करून गुन्हे करणाऱ्यावर आळा घालण्यासाठी वेंगुर्ला – मातोंड पेंडूर हद्दीत ही तपासणी करण्यात येत होती.
पोलिसांच्या या कामात वाहतूक पोलिस देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. बेदरकार वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, अल्पवयीन मुलांकडून वेगाने वाहन चालवणे अशा चुकीच्या पद्धतींना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिस लक्ष ठेऊन आहेत.
या कारवाईत महिला पोलिस हवालदार रंजिता चौहान , पो. नाईक नितीन चोडणकर, वाहतूक पोलिस अंमलदार मनोज परूळेकर, पांडुरंग खडपकर, महिला पोलिस अंमलदार उषा शिरोडकर आदींनी सहभाग घेतला होता.